नद्यांचे संवर्धन होणे गरजेचे- शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:56 IST2021-02-21T23:55:58+5:302021-02-21T23:56:11+5:30
शरद पवार : रोह्यातील कुंडलिका प्रकल्पाचे लोकार्पण

नद्यांचे संवर्धन होणे गरजेचे- शरद पवार
रोहा : नद्या समाजाला प्रेरणा देतात. तेच आपण उद्ध्वस्त करीत आहोत. देशात, राज्यात अनेक नद्या आहेत. नदीकाठी संस्कृती वाढत असते, जीवनात प्रचंड परिणाम करणाऱ्या नद्या दूषित करण्याचे काम आपण करत आहोत. असे असताना रोह्यातील कुंडलिका नदीचे संवर्धन केले जात आहे, कुंडलिका स्वच्छता करण्याचा संकल्प आज, रविवारी रोहेकरांनी केला आहे. त्यामुळे रोह्यातील मान्यवरांची जननीला दुर्लक्षित केली, पण आज ती स्वच्छ केली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मांडले.
रोहा येथे नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ४० कोटींच्या कुंडलिका नदीसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. शरद पवार यांनी नदी प्रदूषणाच्या मुद्द्याला हात घालत चिंता व्यक्त केली. यावेळी कोकणच्या विकासाच्या मुद्द्याला हात घालत औद्योगिक वसाहत, फलोत्पादन, पर्यटन आणि मत्स्यव्यवसायावर आधारित कोकणचा विकास साधण्याची कल्पना मांडली.
रायगड हा विकासाला आणि पर्यटनाला चालना देणारा जिल्हा असल्याचे पवार म्हणाले. याप्रसंगी खा. सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आ. अनिकेत तटकरे, राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, गटनेते महेंद्र गुजर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन करत सामाजिक अंतर पाळण्यात आले.