लाल केळीच्या उत्पन्नात वाढ!
By Admin | Updated: August 27, 2015 23:15 IST2015-08-27T23:15:57+5:302015-08-27T23:15:57+5:30
रायगड जिल्हा परिषदेने लाल केळीच्या पिकाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतीला पुन्हा सुगीचे दिवस आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अस्तित्वात असणाऱ्या ५० हेक्टर क्षेत्रामध्ये

लाल केळीच्या उत्पन्नात वाढ!
- आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेने लाल केळीच्या पिकाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतीला पुन्हा सुगीचे दिवस आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अस्तित्वात असणाऱ्या ५० हेक्टर क्षेत्रामध्ये तब्बल ५०० हेक्टरपर्यंत वाढ करून वर्षाला ३० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा पर्याय जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. केरळ राज्यातील लाल केळी जिल्ह्यात पिकविण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
औद्योगिकीकरणाच्या रेट्यामध्ये शेतीचे क्षेत्र कमी होत आहे, तर दुसरीकडे शेतीची ओळख ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे साधन अशी झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने भाताचे पीक घेतले जाते. त्याचप्रमाणे आंबा, काजू, नाचणी, वाल आणि भाजीपाला यांचीही शेती केली जाते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या पट्ट्यामध्ये केळीच्या बागा बऱ्यापैकी विकसित झाल्या आहेत. या पट्ट्यामध्ये सुमारे ५० हेक्टर क्षेत्रावरच साध्या लांब केळीचे पीक घेतले जाते.
केरळ राज्यातील लाल केळीच्या जाती जिल्ह्यात काही शेतकऱ्यांकडे आहेत. त्यांच्याकडून घेतलेल्या कंदावर दापोली कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. लाल केळीची कार्यपद्धती विकसित करून केळीची रोपे त्यांच्याकडूनच प्राप्त होणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी दिली.
केळी पिकाला पाणी मोठ्या प्रमाणात पाणी लागते आणि जिल्ह्यामध्ये पाऊस मुबलक प्रमाणात पडत असल्याने पाण्याची कमतरता नाही. एक हेक्टरमध्ये सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न केळी पिकाच्या माध्यमातून प्राप्त होते. सध्या ५० हेक्टर क्षेत्रावर केळीचे उत्पादन घेतले जात असून ते विखुरलेले आहे.
लाल केळींना बाजारात मागणी
केळीचे क्षेत्र ५०० हेक्टरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याने त्या माध्यमातून ( ५०० गुणिले सहा लाख ) = ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविणे सहज शक्य होणार आहे. लाल केळी बाजारात १५० रुपये डझनने विकली जातात. ती चवीला गोड आणि मधुर असतात.
या लाल केळींना बाजारात मागणी आहे. जिल्ह्यात पिकविलेली लाल केळी मुंबईच्या बाजारात विकल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाल केळीचे पीक घेऊन उत्पन्न वाढवावे असे आवाहनही जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा केरळ राज्यात गेला होता. तेथे लाल केळी आणि तिच्या अर्थकारणाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाल केळीचे पीक घेतल्यास तेही संपन्न होऊ शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाल केळीचे पीक घ्यावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडून प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
- अरविंद म्हात्रे, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद