कडधान्ये पिकातून उत्पादन
By Admin | Updated: April 17, 2017 04:37 IST2017-04-17T04:37:12+5:302017-04-17T04:37:12+5:30
कमीत कमी मेहनत व आर्थिक खर्चही कमी करावा लागत असल्याने कडधान्याची पिके शेतकरीवर्गाला परवडू लागली आहेत.

कडधान्ये पिकातून उत्पादन
रोहा : कमीत कमी मेहनत व आर्थिक खर्चही कमी करावा लागत असल्याने कडधान्याची पिके शेतकरीवर्गाला परवडू लागली आहेत. तर कडधान्ये पिकाच्या अखेरच्या टप्प्यात कडधान्ये पिकापासून चांगले उत्पादन मिळाले असल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे.
तालुक्यात बहुतांश भागात मागील चार वर्षांपासून उन्हाळी भातशेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्याने आपली पिकती शेती ओसाड जाण्याऐवजी व रोजीरोटीचे साधन म्हणून शेतकऱ्यांनी कडधान्ये शेतीला प्राधान्ये देत कडधान्याची पिके घेण्यास सुरुवात केली. कडधान्ये शेतीचा पूर्वंपार अनुभव शेतकरीवर्गाला असल्याने त्याचाही फायदा होऊ लागला. कडधान्याची शेती एकटा माणूस घरच्या घरी करू शकतो, त्यामुळे वेगळी मजुरी मोजावी लागत नाही. याशिवाय शेती नांगरणे, खते, बी-बियाणे यांचाही खर्च होत नसल्याने शेतकरीवर्गाला ही शेती परवडत आहे. सद्यस्थितीत कडधान्याच्या शेतीत वाल, पावटे, हरभरे, मटकी, मूग, तूर, उडीद, चवळी आदी पिके चांगल्या पद्धतीत पिकविली जात आहेत. काही ठिकाणी नारू या पिवळ्या विषारी वेलीच्या रोगाचा अपवाद वगळता या पिकांवर इतर कोणत्याही रोगाची लागण होत नसल्याने कडधान्याची शेती परवडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)