सोशल मीडियाचा सकारात्मक वापर
By Admin | Updated: May 9, 2016 02:27 IST2016-05-09T02:27:39+5:302016-05-09T02:27:39+5:30
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आपण सारे’ या व्हॉट्सअॅप ग्रुपने आजवर अनेकांचे प्राण वाचवले असून, हा आदर्श उपक्रम आहे

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर
खालापूर : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘आपण सारे’ या व्हॉट्सअॅप ग्रुपने आजवर अनेकांचे प्राण वाचवले असून, हा आदर्श उपक्रम आहे. सोशल मीडियाचा होत असलेला सकारात्मक वापर आदर्श निर्माण करीत आहे, असे प्रतिपादन खालापूर तालुक्याचे तहसीलदार अजित नैराळे यांनी केले.
गेल्या ५२ दिवसांत विविध कारणाने खोपोली परिसरात पाच तरुणांना मोटारसायकल अपघातात जीव गमवावा लागला असून, जखमी होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या ग्रुपने खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणात तरुणाई नव्हे, तर संपूर्ण समाजाला प्रेरक असा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेच नव्हे तर शहरातील नामांकित व्यक्ती या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या होत्या. गेले आठवडाभर अनेक माध्यमांतून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची चर्चा होती. महामार्गावरून अत्यंत महागड्या किमतीच्या दुर्मीळ मोटारसायकलस्वार प्रवास करण्याचा छंद जोपासत असतात. त्यांचे अनुकरण करीत धूमस्टाईल मोटारसायकल चालवणारे तरुण अपघातात सापडत आहेत. हे लक्षात घेऊनच या कार्यक्रमात आम्ही मोटारसायकल रायडिंगचा आनंद घेताना सुरक्षेची कोणती साधने वापरतो आणि ती कशी आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. खूप स्वस्तातली सुरक्षारक्षक साधने आपण वापरत नसल्याने एवढेच नव्हे, तर साधे हेल्मेट न वापरल्याने मोलाचा जीव गमावून बसतो. असे यापुढे कोणाच्या बाबतीत घडू नये, यासाठी उपस्थितांकडून शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातून अनेक तरुण व पालक यावेळी आवर्जून उपस्थित होते. अत्यंत साधेपणाने कोणताही अवाजवी खर्च व स्वागत किंवा आभाराची औपचारिकता पार न पाडता फक्त अपघातात कशी मदत करावी, सुरक्षिततेची साधने कशी वापरावीत व अपघातांचे प्रमाण कसे घटवता येईल, या बाबींकडे लक्ष दिले गेले. या व अशा उपक्रमांतून समाजातल्या नीतिमूल्यांची जाणीव तर होतेच किंबहुना आपण कुठेतरी कमी पडत आहोत, आपल्याही समाजसेवेसाठी दोन पावले पुढे ठेवली पाहिजेत, अशी प्रेरणा मिळते. असे सांगताना वाहने नियमाने चालवावीत, अल्पवयीन मुलांच्या हातात पालकांनी वाहने देऊ नयेत, अपघातात मदतीला हयगय करू नका, असो मार्गदर्शनवजा सल्ला अजित नैराळे यांनी दिला.
हनुमान मंडळाचे राजेंद्र फक्के, नरेंद्र गायकवाड, किशोर पाटील, सुजाता जाधव यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. जगदीश मरागजे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रुपचे गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले.