नेरळ उर्दू शाळेला पालकांनी ठोकले टाळे
By Admin | Updated: February 21, 2016 02:47 IST2016-02-21T02:47:49+5:302016-02-21T02:47:49+5:30
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ येथील उर्दू शाळेत आठ शिक्षकांची पदे मंजूर असूनही गेल्या अनेक वर्षांपासून चार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी

नेरळ उर्दू शाळेला पालकांनी ठोकले टाळे
कर्जत : तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ येथील उर्दू शाळेत आठ शिक्षकांची पदे मंजूर असूनही गेल्या अनेक वर्षांपासून चार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक एका पदवीधर शिक्षिकेची बदली पनवेल येथे करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकले असून शाळा बेमूदत बंद, असा फलक लावून उपोषणाचा इशारा दिला आहे.
नेरळ येथे रायगड जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची उर्दू शाळा असून, २०३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक वर्षांपासून येथे आठ शिक्षकांऐवजी चारच शिक्षक कार्यरत आहेत. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युसूफ हनीफ सय्यद गेल्या दोन वर्षांपासून उपसंचालक शिक्षण विभाग मुंबई, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी, शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कर्जत यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीच करवाई झाली नाही. २३ डिसेंबर २०१५ ला कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षिकांची अचानकपणे पनवेल येथे बदली केली आहे. त्यामुळे येथे चार शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीने २७ जानेवारीस पालक सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.
शाळेला शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत नेरळ उर्दू शाळेत मुलांना पाठविणार नाहीत, असा निर्णय पालकांनी घेतला आहे. (वार्ताहर)
कर्जत तालुक्यात नऊ उर्दू शाळा असून, आठ शाळांतील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांचे समायोजन न झाल्याने सर्व शाळेत उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथील पदे रिक्त आहेत.
- सुरेश डंबाये, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती कर्जत