पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By Admin | Updated: May 2, 2016 01:10 IST2016-05-02T01:10:45+5:302016-05-02T01:10:45+5:30

उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील

The number of villages with water scarcity increased | पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

खोपोली : उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठक घेवून संबंधित विभागाला पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याचे कसे नियोजन करावे याचे निर्देश दिले आहेत. मात्र तीव्र उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सामना करताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत असून हंडाभर पाणी मिळविण्यासाठी तालुक्यातील काही भागांमध्ये महिलांना वणवण करावी लागत आहे. पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने पुढील काही दिवसात खालापूरमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
खालापूर तालुक्यातील बोरगाव, कुंभिवली, टेंभरी व शिरवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वीरगाव ठाकूरवाडी, कुंभिवली कातकरवाडी, खरसुंडी कातकरवाडी, खरसुंडी बौद्धवाडी, कुंभिवली बौद्धवाडी, आंबेमाळवाडी, ढेबेवाडी, बर्गेवाडी आदी ठिकाणी सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रानसई आदिवासीवाडी, चिंबोडा ठाकूरवाडी, वावर्ले कातकरवाडी, तीनघर ठाकूरवाडी, बोरगाव सोंडेवाडी, पौद कातकरवाडी या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. खालापूर तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असून पुढील महिन्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.
पाणीटंचाईमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी डोक्यावर हंडे घेवून लांबून महिलांना पाणी आणावे लागत आहे. प्यायला पाणी नसल्याने कपडे धुण्यासाठीही काही किमीची पायपीट करून महिलांना कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. गुरांचेही पाणी नसल्याने हाल होत आहेत.
प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी दुर्गम भागातील वाड्या व गावांमध्ये मात्र यंत्रणा पोहचली नसल्याचे चित्र आहे. टंचाईग्रस्त वाड्या व गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही पुढील काही दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना खालापूरकरांना करावा लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: The number of villages with water scarcity increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.