विकासाच्या परिघावर कातकरी उपरेच!
By Admin | Updated: September 6, 2015 22:20 IST2015-09-06T22:20:41+5:302015-09-06T22:20:41+5:30
महिगाव येथील कुटुंबांची दैनावस्था : ना रस्ता, ना पाणी; ना रोजगार, ना आरक्षणाचा लाभ

विकासाच्या परिघावर कातकरी उपरेच!
सायगाव : अनेक पंचवार्षिक आल्या गेल्या, अनेकदा सत्तापालट झाला, विकासाच्या त्याच त्या पोकळ घोषणा झाल्या. जुने गेले, नवे आले, तेच ते कित्ते गिरवून झाले; पण विकास कशाला म्हणतात ते गरीब जमातील अजून माहीतच नाही. कारण गेल्या पन्नास वर्षांत यांच्या वस्तीपर्यंत स्वातंत्र्य अजून फिरकलंच नाही. स्वातंत्र्याचं केलं काय? आमच्या वाट्याला आलंच नाय, असा परखड प्रश्न आता हे आदिवासी विचारू लागलेत. सायगाव विभाग हा तालुक्याच्या तुलनेत विकसित मानला जातो; मात्र या पुढारलेल्या गावांना लागून गावकुसाच्या अडोशाने गेले कित्येक वर्षे आदिवासी कातकरी समाज खितपत पडलेला आहे. ओढ्यातील खेकडे, मासे पकडून त्यावर कशीबशी उपजीविका करीत आहेत. अनेकदा पुराच्या पाण्याचा धोका आणि लगतच असलेली स्मशानभूमी अशा दुरवस्थेत राहणाऱ्या लोकांना काही वर्षांपूर्वी हौसाबाई यशवंत सणस आणि यशवंत सणस यांनी आपली हक्काची जागा उपलब्ध करून दिली. महिगावपासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगरालगत पायथ्याला गेली कित्येक वर्षे सुमारे अठरा कुटुंबे अत्यंत बिकट अवस्थेत आयुष्य कंठत आहेत. अत्यल्प शिक्षणामुळे कुठेही रोजगार मिळत नाही. त्यामुळे मिळेल त्या रोजगारावर मिळेल तेव्हा शेतमजुरी करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. पावसाळ्यात नदी, नाल्यांना पाणी असल्याने मासे, खेकडे फार कमी मिळतात. एवढ्या उत्पन्नावर कुटुंब चालवणे जिकिरीचे बनते. घरात खाणारी तोंडे भरपूर असल्यामुळे अनेकदा कर्जाशिवाय गत्यंतर नसते. मात्र, रोजगाराचे साधन नसल्याने परतफेडीची हमी मिळत नाही. अशावेळी संपूर्ण कुटुंब शेतमजुरी करते. कुणाकडेही शेती नसल्यामुळे सर्व गोष्टी विकत घेऊन खाणे परवडत नाही. (वार्ताहर)
कोण आहेत कातकरी ?
कातकरी ही एक महाराष्ट्रातील प्रमुख आदिम शिकारी जमात समजली जाते. यांना कातकरी, काथोडी, दोर कातकरी म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागांत ओळख आहे. अत्यंत दयनीय, गरीब मागास समाज म्हणून ही जमात ओळखली जाते. शिकारीवर बंदी असल्याने ते फक्त मासे आणि खेकड्यांवर उपजीविका करतात. या जमातीचे कोठेही भक्कम नेतृत्व नाही. गावाच्या आडोशाने हे जीवन जगतात. श्रमिक सारख्या अनेक संस्था यांच्या स्थलांतर व उपजीविकेवर काम करत आहे. बचत गटामधून बांधणीचे प्रयत्नही शासन करीत आहे.
पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या जमातीला सरपंचपदाची संधी मिळाली होती. मात्र, ऐनवेळी दुर्लक्ष झाल्यामुळे हा समाज नेतृत्वापासून वंचित राहिला. - बाळासाहेब सणस, कार्यकर्ता
माझे आई-वडील मासे पकडायला जातायत; पण या दिवसात खूप कमी मासे मिळतात. आता कुणी कामावर बोलवले तर जाणार नाहीतर आजचा दिवस वाया. - वसंत पवार, आदिवासी युवक
गेली अनेक वर्षे आम्ही या आदिवासींसोबत राहतो; पण आजतागायत यांना रस्ता नाही, पाणी नाही. हे सर्व मिळाल्याशिवाय आज त्यांना गत्यंतर नाही. - हौसाबाई सणस,
आदिवासी कार्यकर्त्या