कळंब परिसरात वणव्यांचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: April 21, 2017 00:23 IST2017-04-21T00:23:30+5:302017-04-21T00:23:30+5:30
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन

कळंब परिसरात वणव्यांचे प्रमाण वाढले
नेरळ : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन, ओसाड माळराने यामुळे वणव्यांचे प्रकार अधिक वाढत असून यामुळे वनसंपत्तीचा आणि जमिनीतील उपयुक्त जीवांचा नाश होत आहे. पर्यायाने पर्यावरणाला मोठे नुकसान होत आहे. हे वणवे मानवनिर्मित असल्याने ग्रामपातळीवर वणवामुक्त मोहीम राबविणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींना सहभागी करून लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. परंतु असे होताना दिसत नसल्याने याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील अनेक डोंगर दऱ्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढत असतात. गवत पेटविल्याने तेथे चांगले गवत उगवते अशी मानसिकता लोकांची आहे. त्यामुळे हे वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वनसंपत्ती, सांैदर्य नष्ट पावत आहे. या परिसरात स्थानिक लोकांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु काही जण जमीन न कसता, नोकरी करत असतात. त्यामुळे शेतीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शेतीविषयक ज्ञान व जागृतीचा अभाव दिसतो.
काही ठिकाणी ओसाड जमिनी आणि त्या ठिकाणी वाढलेले गवत, राब भाजवणी पद्धत यामुळे वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. मार्च-एप्रिल-मे महिन्यात वणव्यांचे प्रमाण वाढते. संपूर्ण माळराने या वणव्यात बेचिराख होत असतात, छोटी मोठी झाडेही जळून जातात. काही अर्धवट जळतात, ती झाडे वृक्षतोड करणाऱ्यांकडून लक्ष्य केली जातात. त्यामुळे अशा वणव्यांमुळे व वृक्षतोडीमुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची सर्वांत मोठी हानी करणाऱ्या या वणव्यांमुळे अनेक आंब्याची, काजूची आदी झाडे नष्ट होत आहे. त्यामुळे लहान मुलांसारखी जतन केलेली झाडे नष्ट होतात.
वनविभागाने प्रबोधन केल्यास वणव्याचे दुष्परिणाम लोकांच्या निदर्शनात आणून दिल्यास वणवा मुक्तीची मोहीम सफल होईल.परंतु जीवसृष्टीच्या रक्षणासाठी लोकजागृती, स्थानिक मंडळे, कार्यकर्ते व वन विभाग प्रशासन यांनी प्रबोधन मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. वणवा लावणाऱ्यांसाठी ग्रामपंचायतीमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करून कार्यवाही केली पाहिजे, असे तज्ज्ञ मंडळींचे मत आहे. (वार्ताहर)