अवजड वाहतूक दिवसात आठ तास बंंद; जेएनपीटीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:00 IST2019-09-11T22:59:47+5:302019-09-11T23:00:04+5:30
करळ फाटा ते आम्रमार्ग वाहतूककोंडी समस्या सोडवण्यासाठी बैठक

अवजड वाहतूक दिवसात आठ तास बंंद; जेएनपीटीचे आश्वासन
उरण : सातत्याने वाहतूककोंडीसाठी कारणीभूत ठरणारी करळ फाटा ते आम्रमार्ग कंटेनरची होणारी अवजड वाहतूक सकाळी ६ ते १० आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी दिवसभरादरम्यान चार-चार तास बंंद करण्याच्या मनसेच्या मागणीवर बुधवारी झालेल्या बैठकीत जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी होकार दिला आहे. जेएनपीटीने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे डोकेदुखी ठरलेल्या लाखो उरणकरांची वाहतूककोंडीच्या जटील समस्येतून सुटका होण्यास मोठी मदत होणार आहे.
जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवजड कंटेनर मालाच्या वाहतुकीमुळे करळ फाटा ते आम्रमार्ग दरम्यानच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. या दोन्ही महामार्गावर होणाºया वाहतूककोंडीचा सामना हजारो वाहन चालक आणि प्रवाशांना करावा लागत आहे. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी ये-जा करणाºया हजारो विद्यार्थी, कामगार आणि रुग्णांना वाहतूककोंडीच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी आणि वाढत्या रहदारीमुळे या मार्गावरील अपघातांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
यामध्ये आता या दोन्ही मार्गावरील करळफाटा, सीबीडी, गव्हाण फाटा, तरघर या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून सुरू असलेली उड्डाणपूल उभारण्याची कामे मुदत उलटून गेल्यानंतरही आणि वर्षभराची आणखी मुदतवाढ दिल्यानंतरही अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाहीत. उड्डाणपुलांच्या अर्धवट कामांमुळे मात्र, वाहतूककोंडीची समस्या आणखीनच गंभीर झाली आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांवर हजारो वाहने आणि प्रवासी यांना सकाळ आणि संध्याकाळ दरम्यान दररोज दोन-दोन तीन-तीन तास अडकून राहाण्याची पाळी येते. मागील दहा वर्षांपासून उरणकरांना भेडसावत आलेली समस्या दूर करण्यासाठी मनसेकडून जेएनपीटी, सिडको, वाहतूक नियंत्रण विभाग यांच्याशी पत्रव्यवहार, संपर्क साधून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर जेएनपीटी आणि मनसे पदाधिकारी यांची बुधवारी बैठकही झाली. जेएनपीटी प्रशासन भवनात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी, सीएमडी जयवंत ढवळे, मनीषा जाधव, एन.के. कुलकर्णी, एस. व्ही. मदभावी आदी जेएनपीटीच्या विविध विभागांचे अधिकारी आणि मनसे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, उरण तालुका अध्यक्ष जयंत गांगण, विजय तांडेल, अभिजित कडू , सत्यवान भगत आणि मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
1) या बैठकीत जेएनपीटीमुळे प्रचंड प्रमाणात होणारी वाहतूककोंडी, रखडलेले सर्व्हिस रोड आणि मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही अर्धवट अवस्थेत असलेली उड्डाणपुलांची कामे, नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय, जेएनपीटीमध्ये ठेकेदारीच्या विविध कामात सुरू असलेले गैरप्रकार आणि त्याकडे भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष याकडेही मनसे जिल्हाध्यक्ष अतुल भगत आणि पदाधिकाºयांनी लक्ष वेधले. यावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करण्याचे आश्वासन देतानाच वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त उपाययोजना केल्या जातील, असे सेठी यांनी सांगितले.
2) करळ फाटा ते आम्रमार्ग दरम्यान कंटेनरची होणारी अवजड वाहतूक सकाळी आणि संध्याकाळी अशी दिवसभरातील चार-चार तास बंंद करण्याबाबतही सेठी यांनी तयारी दाखवली. यासाठी पोलीस, सिडको यांच्याशी येत्या आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासनही दिले. तसेच सध्या तयार झालेल्या सर्व्हिस रोडवरील अनधिकृत वाहनांची पार्किंग हटविण्यासाठी आणि कारवाईसाठी पोलिसांनी चर्चा करून ठेकेदार नियुक्त करण्यात येईल, असे आश्वासनही जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिले.