‘त्या’ निराधार बालकांना गवसली दिशा
By Admin | Updated: October 29, 2016 04:02 IST2016-10-29T04:02:36+5:302016-10-29T04:02:36+5:30
दहा वर्षांची प्रेरणा, आठ वर्षांची प्राजक्ता आणि अवघ्या पाच वर्षांचा दत्ता या तिघा भावंडांचे मातृछत्र अकाली हरपले आणि स्वच्छंदी बागडण्याच्या ऐन कोवळ््या वयातच त्यांच्या

‘त्या’ निराधार बालकांना गवसली दिशा
- जयंत धुळप, अलिबाग
दहा वर्षांची प्रेरणा, आठ वर्षांची प्राजक्ता आणि अवघ्या पाच वर्षांचा दत्ता या तिघा भावंडांचे मातृछत्र अकाली हरपले आणि स्वच्छंदी बागडण्याच्या ऐन कोवळ््या वयातच त्यांच्या वाट्यास जगण्याची भ्रांत आली. परंतु ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या उक्तीनुसार त्यांच्या आयुष्यास खऱ्या अर्थाने दिशा देण्यासाठी अगदी देवासारखी उभी राहिली ती कर्जतमधील दिशा केंद्र संस्थेच्या माध्यमातून कार्यरत ‘चाईल्डलाइन’ ही निराधार बालकांना आधार मिळवून देणारी केंद्र सरकारची योजना.
१० वर्षांची प्रेरणा सुनील सिंग, आठ वर्षांची प्राजक्ता सुनील सिंग आणि अवघ्या पाच वर्षांचा दत्ता सुनील सिंग ही तिन्ही भावंडे कर्जतमधील गुंडगे येथील रोहिदास नगरमध्ये राहात होती. त्यांचे वडील सुनील सिंग यांनी काही वर्षांपूर्वी पत्नी अनिताला घटस्फोट दिला. गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुनील सिंग हे अनिताकडे परत आले. काही दिवसांनी अनिता आजारी पडली. फेब्रुवारी २०१६ मध्ये किडनीच्या आजाराने अनिताचा मृत्यू झाला. यानंतर सुनील सिंग दारू पिऊन मुलांना मारहाण करीत असत. यामुळे ही तीनही भावंडे त्यांचे आजोबा वसंत मसुगडे यांच्याकडे राहायला लागली.
मुलांचे वडील सुनील सिंग कर्जतमध्येच एका हॉटेलात काम करतात. आजोबा वयस्कर आहेत आणि ते कर्जत रेल्वे कॅन्टींगमध्ये काम करून या मुलांचा सांभाळ करत होते. दत्ता लहान असल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये सोबत घेऊ न जायचे, मात्र अल्पवयीन प्रेरणा आणि प्राजक्ता या दिवसभर गावात फिरत असायच्या, परिणामी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
आजोबा वसंत मसुगडे यांनी चाईल्डलाइनकडे मुलांना संगोपनासाठी मदत मागितली. दिशा केंद्र रायगड चाईल्डलाइनने या मुलांना बाल कल्याण समितीच्या सहकार्याने, अलिबागजवळच्या सोगाव येथील निराधार मुलांकरिताच्या एसओएस बालग्राममध्ये दाखल केले. आता या मुलांची एसओएस बालग्राममध्ये निवारा, पौष्टिक आहार तसेच शिक्षणाची देखील सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आणि त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद निर्माण झाला असल्याची माहिती दिशा केंद्राचे समन्वयक अशोक जंगले यांनी दिली आहे.