ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
By Admin | Updated: October 14, 2016 06:48 IST2016-10-14T06:48:21+5:302016-10-14T06:48:21+5:30
तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीची ग्रामसभा पुन्हा तहकूब करण्यात आल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाला चक्क टाळे ठोकले. गांधी जयंती दिनी तहकूब झालेली ग्रामसभा गुरुवारी

ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
अलिबाग : तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीची ग्रामसभा पुन्हा तहकूब करण्यात आल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाला चक्क टाळे ठोकले. गांधी जयंती दिनी तहकूब झालेली ग्रामसभा गुरुवारी होणार होती मात्र ग्रामसेवक हजर नसल्याचे कारण देत सरपंचांनी ग्रामसभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून कुर्डूस ग्रामपंचायतीची ओळख आहे. गावाच्या विकासासह विविध विषयांवरील चर्चेसाठी दरवर्षी किमान चार आणि कमाल सहा ग्रामसभा घेतल्या जातात. लोकशाहीचे बलस्थान हे ग्रामसभा असल्याचे मानले जाते. परंतु निम्म्या ग्रामसभा वेगवेगळी कारणे देऊन सत्ताधारी रद्द करीत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. ग्रामसभा रद्द होत असल्याने लोकांना त्यांचे प्रश्नच मांडण्याची संधी मिळत नसल्याचे ग्रामस्थ अनंत सोमा पाटील यांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या प्रश्नांसंदर्भात ग्रामपंचायत निर्णयच घेणार नसेल तर ग्रामपंचायतीची गरजच काय आहे, असा सवाल ग्रामसभेसाठी उपस्थित असलेल्या महिलांनी सरपंचांना विचारला. सुमारे १०० ग्रामस्थांची उपस्थिती असताना ग्रामसेवक नसल्याचे कारणे देऊन कुर्डूस ग्रामपंचायतीने मनमानी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जबाबदार असलेल्या ग्रामपंचायतीची चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत पिंगळे, विजय म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, नथुराम म्हात्रे, दीपक पाटील, रवींद्र म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे, मोहन पिंगळे आदी ग्रामस्थांनी केली. चौकशी न झाल्यास गावातील जागरूक व प्रतिष्ठित नागरिकांचे एक शिष्टमंडळ रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करावी, अन्यथा ग्रामपंचायतीचे कामकाज अनिश्चित काळासाठी बंद राहील, असे लेखी निवेदन कुर्डूसच्या सरपंचांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे. (प्रतिनिधी)