दागिने चोरीत महिलांची टोळी
By Admin | Updated: June 17, 2017 00:50 IST2017-06-17T00:50:03+5:302017-06-17T00:50:03+5:30
रायगड जिल्ह्यात गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीने महिलांना बेजार केले असून, पोलिसांची झोप उडवली आहे.

दागिने चोरीत महिलांची टोळी
- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीने महिलांना बेजार केले असून, पोलिसांची झोप उडवली आहे. मात्र पोयनाड पोलीस ठाण्यातील जागरूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे तिघींना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पोयनाड एसटी स्टॉपवर बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दागिने व रोकड लंपास करून फरार झालेल्या तीन महिलांना पोयनाड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक के ली. त्यांच्याकडून ४७ हजार २५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल परत मिळविण्यात यश मिळविले आहे. या तीनही महिला मुंबईतील बोरीवली येथील हायवे ब्रिजच्या खालील झोपडपट्टीत राहणाऱ्या आहेत.
एक महिला प्रवासी पोयनाड बस स्टॅण्ड येथून बसमध्ये बसून अलिबाग येथे जात असताना तिकीट काढण्यासाठी पर्समध्ये हात घातला असता त्यांना पर्स चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्या लगेच पेझारी नाका येथे उतरल्या व आपल्या पतीस फोन करून हकिकत सांगून त्यांच्या मदतीने पोयनाड पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. पोयनाड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोयनाड नाका येथे जाऊन, तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात आरोपी महिला कैद झाल्या होत्या. पोलिसांनी तपासाअंती कार्लेखिंडीच्या पुढे एका झाडाखाली या तिघींना अटक केली. त्यांच्याकडे चोरीचे ४७ हजार २५० रुपये किमतीचे दागिने व रोकडही सापडली.