मोठ्या जहाजांमुळे मासेमारीला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:18 IST2019-01-29T23:17:56+5:302019-01-29T23:18:09+5:30

दिघी बंदरामुळे अडचण; पारंपरिक मासेमारी धोक्यात

Fishery fired by big ships | मोठ्या जहाजांमुळे मासेमारीला बसतोय फटका

मोठ्या जहाजांमुळे मासेमारीला बसतोय फटका

दिघी : एकीकडे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ‘सागरमाला’ प्रकल्पातून सरकारने परिणामकारक पावले उचलली आहेत. यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील दिघी येथील रोजगार मिळवून देणारी पारंपरिक मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. श्रीवर्धन तालुक्यालगत राजपुरी खाडीवर उभे राहत असलेले दिघी बंदर हे पारंपरिक मासेमारीला घातक ठरणार या काळजीने दिघी, आगरदांडा व राजपुरी परिसरातील मच्छीमार चिंताग्रस्त आहेत.

दिघी या पारंपरिक बंदर खासगीकरणातून विकास या संकल्पनेतून अत्याधुनिक बंदर उभारण्याचा प्रकल्प बालाजी लिझिंग अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेड ही कंपनी विकसित करत आहे. दिघी बंदर अद्याप ५० टक्केही विकसित झाले नाही. सध्या सुरू असलेला महाकाय जहाजांचा प्रवास यामुळे कालांतराने सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर बंदी घातली जाणार आहे. ही भीती भूमिपुत्रांच्या मनात घर करून आहे. अतिशय कमी भावात दिघी पोर्टसाठी आपल्या जमिनी देताना असा विचारही जमीनदारांच्या मनात आला नव्हता. या प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी त्यांना विविध आश्वासने देण्यात आली होती. त्यात गावातील सुविधा स्थानिकांना रोजगार यासह स्थानिकांना ठेके देऊन येथील तरुणांना स्वयंपूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले होते. या गोष्टींची पूर्तता अद्याप झालेली नाही. कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक तरु णांची फसवणूक केली आहे, त्यामुळे कंपनीच्या विरोधात नाराजी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील अनेक स्थानिक या समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात. दरम्यान, वातावरणातील बदल, अवेळी वादळाची हजेरी, मासेमारी दुष्काळ होत असताना कंपनीच्या धोरणामुळे पारंपरिक मासेमारी करणाºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

दिघी बंदरात गेल्या पाच-सहा वर्षांपासून मोठी जहाजे येत आहेत. ही जहाजे येत असताना दिघी गावातील मच्छीमार बांधवांनी मच्छीसाठी टाकलेली जाळी व डोलवी तुटली जातात, त्यामुळे जाळ्याचे व मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पूर्वी दिघी पोर्ट प्रत्येक जहाजामागे नुकसानभरपाई देत होते. मात्र, सध्या अशी कोणतीही नुकसानभरपाई देत नाही. दिघी बंदरामुळे दिघी गावातील मच्छीमारी करणारी ६० कुटुंबे बाधित झाली आहेत.

दिघी बंदरात महाकाय जहाजांच्या होणाºया वाहतुकीमुळे आम्हा मच्छीमारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, कुणीही मदतीला येत नाही. वेळोवेळी होणाºया नुकसानभरपाईसाठी कंपनीकडून विचारलेसुद्धा जात नाही.
- बाळाराम खेलोजी,
दिघी कोळी समाज अध्यक्ष

Web Title: Fishery fired by big ships