दुबार पेरणीच्या संकटावर के ली जिद्दीने मात
By Admin | Updated: October 15, 2016 06:48 IST2016-10-15T06:48:21+5:302016-10-15T06:48:21+5:30
यंदा भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आणि पावसाने जोरदार सुरुवात केली, त्यामुळे बियाणे वाहून गेले. लावणी हंगामात शेतात लावणी केल्यानंतर

दुबार पेरणीच्या संकटावर के ली जिद्दीने मात
विजय मांडे / कर्जत
यंदा भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आणि पावसाने जोरदार सुरुवात केली, त्यामुळे बियाणे वाहून गेले. लावणी हंगामात शेतात लावणी केल्यानंतर मुसळधार पाऊस पडू लागल्याने लावलेले भाताचे रोप वाहून गेले तरीही खचून न जाता एका प्रगतशील शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी वापरलेल्या पध्दतीने भात बियाणाचे रोव तयार करून पेर भात पद्धतीने पेरणी के ली आणि भातपीक घेण्याचा निर्णय घेतला. त्या शेतकऱ्याच्या शेतात आता भरघोस भातपीक तयार होत आहे.
यंदा चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. वेळेवर पाऊस सुरू झाल्याने बळीराजाने उत्साहात पेरण्या केल्या, काहींनी एसआरटी पद्धतीने पेरण्या केल्या होत्या कारण गेल्या वर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे सुद्धा एसआरटी पद्धतीच्या पेरण्या उपयुक्त ठरल्या होत्या. यंदा पारंपरिक पद्धतीने केलेल्या पेरण्या मुसळधार पावसाने वाहून गेल्या तर एसआरटी पद्धतीने केलेल्या पेरण्यांचे बियाणे अतिपावसाने कुजले. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा पेरण्या करण्याची वेळ आली, परंतु वेळ निघून गेली होती. भातपीक हाती येईल काय, अशी शंका होती. या सर्वावर मात केली ती कोषाणे गावातील प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र तातू ठोंबरे यांनी. ठोंबरे यांनी आपल्या आठ एकर जमिनीवर एसआरटी पद्धतीने भातपीक लावले. लावताना त्यांनी सकाळी अर्धा एकर जमिनीवर पेरले व संध्याकाळी उर्वरित साडेसात एकर जमिनीवर भातपीक लावले. त्यानंतर लगेचच मुसळधार पावसाची सुरु वात झाली, रात्रभर पाऊस पडत होता. ठोंबरे पाच दिवसांनी शेतावर गेले तर सकाळी पेरलेल्या जमिनीतून भात रोपे वर आली, परंतु उर्वरित साडेसात एकर जमिनीतून एकही भात रोप वर आले नाही. पंधरा दिवस वाट पाहिली तरीही भात रोप वर येईना. भात बियाणे कुजून गेले होते. यामुळे ठोंबरे अस्वस्थ झाले, मात्र अचानक त्यांना दोन वर्षांपूर्वी केलेला प्रयोग आठवला. त्यावेळी खेकड्यांनी सर्वच्या सर्व भात रोपे फस्त केली होती. त्यावर कल्पना लढवून भात बियाणाचा रोव करून कीटकनाशक मिसळून ते पेरले आणि भात शेती तारली गेली. त्यांनी सकाळी तो प्रयोग करण्याचा निर्णय पक्का केला. चाळीस किलो भात बियाणाची लागवड के ली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊन आज भाताचे चांगले पीक शेतात दिसू लागले आहे.