रायगडावर पर्यटकांची गैरसोय
By Admin | Updated: August 27, 2015 22:59 IST2015-08-27T22:59:00+5:302015-08-27T22:59:00+5:30
छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. यामुळे याबाबत पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रायगडावर पर्यटकांची गैरसोय
महाड : छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. यामुळे याबाबत पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्यामुळे रायगडावर सर्वत्र बहरलेली हिरवाई, वाहणारे धबधबे, मनमोहन टाकणारे धुकं हे सृष्टी सौंदर्य गडावर येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत आहे. या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने रायगडावर येत आहेत. मात्र गडावर त्यांची राहण्याची कुठलीही सोय नसल्याने या पर्यटकांची मोठी निराशा होत आहे.
रायगडावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह असून या विश्रामगृहाची दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी असलेल्या १२ खोल्यांपैकी ५ खोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून उर्वरित ७ खोल्या पर्यटकांना सध्या भाड्याने दिल्या जातात. या पाच खोल्यांवरील छपरे गेल्या पाच वर्षापूर्वी चक्रीवादळात उडून गेली आहेत. तर दरवाजे, खिडक्या पूर्ण मोडक्या अवस्थेत आहेत. या खोल्यांची अंतर्गत देखभाल दुरुस्ती पर्यटन महामंडळ विभागाच्या अखत्यारीत असल्याने पुरातत्व विभाग या देखभाल दुरुस्तीला विरोध करीत आहे.
खोल्यांवरील उडालेले छप्पर टाकण्यास देखील या विभागांच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यामुळे या पाच खोल्यांची दुरुस्ती गेल्या चार-पाच वर्षापासून रखडलेली आहे. परिणामी गडावर येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या उपलब्ध करुन देणे अशक्य होत असल्याचे दिसून येत आहे. याच ठिकाणी पर्यटकांसाठी राहण्यासाठी असलेले दोन हॉल देखील दुरुस्तीविना तसेच पडून आहेत.
उपाहारगृहाअंतर्गतची देखभालीची तीच बिकट अवस्था आहे. गडावर दरवर्षी लाखो शिवभक्त येत असतात मात्र त्यांची होणारी गैरसोय पाहून हे शिवभक्त शासनाच्या नावाने अक्षरश: शिव्यांची लाखोळी वाहत असताना दिसतात.
शिवभक्त व पर्यटकांच्या सोयीसाठी पुरातत्व विभागामार्फत रायगडावर कायमस्वरुपी व्यवस्था केली जावी, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे विभाग स्वत:ही काहीही करत नाही आणि अन्य यंत्रणांनाही कुठल्याही बाबतीत सहकार्य करीत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवपर्यटकांकडून केला जात आहे.