रायगड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात झाली घट;सरकारी प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 23:28 IST2020-09-08T23:27:58+5:302020-09-08T23:28:37+5:30
१५ वर्षांत फक्त १५ सोनोग्राफी सेंटर्सवर कारवाई

रायगड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात झाली घट;सरकारी प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह
निखिल म्हात्रे
अलिबाग : वैद्यकीय सोईसुविधांमुळे प्रसूतिदरम्यान नवजात बालकांचे दगावण्याचे प्रमाण घटत असले, तरी रायगड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सातत्याने घटत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराची आकडेवारी लक्षात घेतली, तर रायगड जिल्ह्यातही कोवळ्या कळ्यांना जन्माआधीच मारले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात नेहमीच लिंगगुणोत्तराचे प्रमाण चांगले राहिले आहे. मात्र, वाढत्या वैद्यकीय सोईसुविधा पाठोपाठ आता हे प्रमाण घटण्यास सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता कोकणातही गर्भलिंगनिदान करून गर्भपात केले जात नाही ना, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यात यास फारशे यश येत नसल्याचे दिसून येत आहे. गर्भाचे लिंगनिदान करून गर्भपात करण्याच्या घटना वाढल्याने सोनोग्राफी सेंटरवर निर्बंध घातले.
१५ वर्षांत १५ सोनोग्राफी सेंटर्सवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी सहा प्रकरणांत सोनोग्राफी सेंटर्स चालवणाऱ्या डॉक्टारांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली, तर चार डॉक्टारांचा मेडिकल कौन्सिलने दिलेला परवाना पाच वर्षांसाठी रद्द केला. उर्वरित डॉक्टरांना नोटिसा बजावल्या. ही सर्व प्रकरणे अनियमिततेशी निगडित होती. ज्यात प्रामुख्याने रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे, परवान्यांचे नूतनीकरण न करणे अशा स्वरूपाचे होते.
व्यापक समाजप्रबोधनाची गरज आहे. यासाठी महिलांनीच पुढाकार घेत आपल्या कुटुंबीयांचे मतपरिवर्तन करायला पाहिजे. गर्भनिदान रोखण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कायद्याच्या दहशतीबरोबरच जन्मदात्री खंबीर राहिली, तर स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार थांबतील.
-अॅड. नीता कोळी, विधि समुपदेशक