नेरळ : कर्जत तालुक्यातील माले येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि महावितरणने विजेचे खांब ठेवले आहे. त्यामुळे याचा त्रास शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडे या शाळेच्या आवारात असलेले साहित्य हटविण्यासाठी पत्रव्यवहार देखील केला आहे, परंतु ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे.सलोख ग्रामपंचायत हद्दीत माले येथे रायगड जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेच्या समोरून कळंब-पाषाणे रस्ता जात आहे. या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यावर टाकण्यासाठी आणलेल्या मोऱ्या (पाइप) शाळेच्या आवारात टाकण्यात आल्या आहेत. रस्ता रखडल्याने दोन वर्षांपासून या मोऱ्या (पाइप) तशाच पडून आहेत व त्याच्याच बाजूला महावितरणचे सिमेंटचे पोल टाकण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना इजा होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. विद्यार्थ्यांचे डोके फुटणे, पायास दुखापत होणे, अशा गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असल्याने या वस्तू हटविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.हे साहित्य ठेवताना शाळेची कोणतीही परवानगी बांधकाम विभागाच्या आणि महावितरणच्या ठेकेदार वा अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. तरीही दोन वर्षे होऊनही हे साहित्य हटविले नाही. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही याची दखल ना सरपंचांनी ना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने ना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे हे साहित्य तसेच शाळेच्या आवारात पडून आहे. तेव्हा हे साहित्य लवकरात लवकर उचलण्यात यावे, अशी मागणी येथील विद्यार्थी, शिक्षकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
माले शाळेच्या आवारात बांधकाम साहित्य
By admin | Updated: April 19, 2017 00:45 IST