शहापुरातील जिताडा व्हिलेजमध्ये पायाभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:17 PM2020-02-25T23:17:26+5:302020-02-25T23:17:31+5:30

१०३ तलावांच्या गावात रस्त्याची दुर्दशा; मत्स्यशेतीसह गृह पर्यटन उद्योगांची होणार भरभराट

Build infrastructure at Jitada Village in Shahapur | शहापुरातील जिताडा व्हिलेजमध्ये पायाभूत सुविधांची वानवा

शहापुरातील जिताडा व्हिलेजमध्ये पायाभूत सुविधांची वानवा

Next

- आविष्कार देसाई 

अलिबाग : जिल्ह्यात काही ठिकाणी शेतीचा व्यवसाय आतबट्याचा होत चालला आहे. शेतीला जोडधंदा उभारल्यास अन्नाचा पोशिंदा असलेला शेतकरी समाधानाने जगू शकतो. हाच धागा पकडून अलिबाग तालुक्यातील शहापूर गावातील शेतकऱ्यांनी तब्बल १०३ मत्स्य तलावांची निर्मिती केली आहे. ‘जिताडा व्हिलेज’ अशी ओळख संपादित केलेल्या शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधांपासून ग्रासले आहे. सरकार आणि प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरविल्यास मत्स्यशेती आणि गृह पर्यटन अशा दुहेरी उद्योगांत भरभराट होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविण्यात येत आहे.

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील काही जमिनी या टाटा आणि रिलायन्सच्या प्रकल्पासाठी सुमारे १३ वर्षांपूर्वी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रकल्पांना आवश्यक असणारे क्षेत्र ठरावीक मुदतीमध्ये संपादित करण्यात न आल्याने दोन्ही कंपन्यांना आपापले प्रकल्प गुंडाळावे लागले. या ठिकाणी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. या ठिकाणच्या जमिनी सुपीक असल्याने शेतीवरच सर्वांचा उदरनिर्वाह चालतो. गावाला लागूनच खाडीचे क्षेत्र आहे. त्यामुळे उधाणाच्या वेळी खारबंदिस्ती तुटून पाणी शेतात घुसण्याचे प्रकार सातत्याने घडतच असतात. ग्रामस्थांनी एकत्र येत खारबंदिस्तीची कामे स्वखर्चाने केली आहेत.

शेतीला जोडधंडा उभारताना परिसरात १०३ शेततळ्यांची निर्मिती केली आहे. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर आणि तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतूनच मत्स्यशेती करण्यात आली आहे. सुरुवातीला केवळ तीन शेततळ्यांची संख्या आज १०३ वर पोहोचली आहे. याच कारणांनी या गावाला ‘जिताडा व्हिलेज’ अशी नवीन ओळख मिळाली आहे.

एक हेक्टरला सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतीच्या माध्यमातूनही सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. अतिशय संघर्षमय परिस्थितीत हा व्यवसाय तरुण उद्योजक करीत आहेत. या सर्व तलावांपर्यंत पोहोचण्यासाठी उन्हाळ्यात बांधावरून, तर पावसाळ्यात चिखल तुडवून जावे लागते. त्यामुळे पर्यटकांची इच्छा असतानाही तलावांपर्यंत जाता येत नाही. तसेच रस्ता नसल्याने मासे बाजारापर्यंत पोहोचवता येत नाहीत. त्यामुळे त्यांना चांगली किंमत मिळत नसल्याने आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचे शेततळेधारक सुनील बाळाराम पाटील यांनी सांगितले.

जिताडा व्हिलेजच्या माध्यमातून जिताडा विक्र ी आणि गृह पर्यटन असा दुहेरी उद्देश आहे. पर्यटनाद्वारे किमान तीन लाख रुपयांचा व्यवसाय तसेच अप्रत्यक्ष रोजगाराद्वारे अडीच लाख प्रति तलाव उत्पन्न मिळू शकते. या सर्व संकल्पना वास्तवात आणण्यासाठी सुमारे १०३ तलावांना जोडणारा रस्ता होणे अत्यंत गरजेचे असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सडक योजनेच्या धर्तीवर ‘पालक मंत्री पाणद रस्ता’ (पाणवठ्यांकडे जाणारा रस्ता) अशी योजना दोन वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. योजनेतून तलावांकडे जाणारे रस्ते निर्माण केल्यास शेतकºयांच्या हिताचे होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे लेखी मागणी करण्यात आली असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले.

रायगडच्या जिल्हाधिकाºयांकडे पालकमंत्री पाणद रस्त्याचा नियोजित मार्ग, नकाशा सुपूर्द केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नियोजित रस्त्याचे सर्वेक्षण आणि स्थळपाहणी अलिबागचे तहसीलदार यांच्यामार्फत डिसेंबर २०१९ मध्ये करण्यात आले आहे. १०३ तलावांसाठी सध्या फक्त अडीच किलोमीटरच्या रस्त्याची आवश्यकता आहे. सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

Web Title: Build infrastructure at Jitada Village in Shahapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.