आयटीच्या जमान्यात आयटीआय मागे
By Admin | Updated: December 7, 2014 22:20 IST2014-12-07T22:20:36+5:302014-12-07T22:20:36+5:30
माहिती आणि तंत्रज्ञानाची चलती असलेल्या या जमान्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ट्रेंड आणि अभ्यासक्रम आहे तसाच आहे.

आयटीच्या जमान्यात आयटीआय मागे
प्रशांत शेडगे, पनवेल
माहिती आणि तंत्रज्ञानाची चलती असलेल्या या जमान्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ट्रेंड आणि अभ्यासक्रम आहे तसाच आहे. त्यामध्ये फारसा बदल न झाल्याने या ठिकाणाहून प्रशिक्षण घेणा-यांना रोजगाराची संधी कमी झाली आहे आणि त्यामुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली आहे.
काही वर्षापूर्वी दहावी आणि बारावीनंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेवून दोन वर्षाच्या आत झटपट नोकरी मिळत असल्याने या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या जास्त असायची. अनेकदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशाकरिता गुणवत्ता यादी लागायची. दहावीतील मिळालेल्या गुणानुसार प्रवेश मिळत असे, त्याकरिता पालकांना मोठी कसरत करावी लागायची. पनवेल येथील आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकरिता जिल्हाच काय तर राज्यभरातून विद्यार्थी येत असत. याचे कारण म्हणजे आजूबाजूला तळोजा, पाताळगंगा एमआयडीसी उभ्या राहिल्या होत्या. या ठिकाणी अनेक कंपन्या सुरु झाल्याने त्यांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यामुळे आयटीआयच्या कॅम्पसमध्येच भरती होत असे. फिटर, मॅकॅनिकल्स, मिल राईट मेंटनेन्स, मशिनिस्ट, ग्रायन्डर, वेल्डर, टर्नर या ट्रेडला अधिक महत्त्व असायचे. याचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्याला नोकरी मिळणार म्हणजे मिळणार. एकंदरीतच या ट्रेडला ग्लॅमर होते, मात्र गेल्या काही वर्षात कारखान्यांमध्ये अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली.
केवळ पनवेलच नाही तर थोड्या फार फरकाने सर्वच आयटीआयमध्ये अशी परिस्थिती असून जुनाट झालेल्या इमारतीत जुनेच ट्रेंड सध्या सुरू आहेत. आयटीआयमधून बाहेर पडणाऱ्या उमेदवाराला लगेचच नोकरी मिळत नसल्याचे एका एजन्सीचे संचालक मधुकर पाटील यांचे म्हणणे आहे.