पुरानंतर महाडवर आणखी एक नवं संकट ओढावलं; प्रशासनाला करावी लागणार प्रचंड मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 08:40 AM2021-08-01T08:40:27+5:302021-08-01T08:44:21+5:30

तपासणीत आढळले लेप्टो, काेराेना, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण ; १८ वैद्यकीय पथके तैनात

After the flood, Now Epidemic diseases crisis hit Mahad; The administration will have to work hard | पुरानंतर महाडवर आणखी एक नवं संकट ओढावलं; प्रशासनाला करावी लागणार प्रचंड मेहनत

पुरानंतर महाडवर आणखी एक नवं संकट ओढावलं; प्रशासनाला करावी लागणार प्रचंड मेहनत

Next
ठळक मुद्देमहाड-तळीयेमध्ये दरड काेसळल्याने ८४ नागरिक डाेंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले५३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित ३१ जणांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव शहरासह अन्य भागांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरल्याने लवकरात लवकर स्वच्छता करण्याचे आव्हान

रायगड : महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरित पडसाद पूर ओसरल्यानंतर दिसू लागले आहेत. कारण आता महाडमध्ये साथीच्या रोगांचे संकट उभे राहिले आहे. महाडमध्ये आतापर्यंत १२,९३१ जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली, तर ३८० नागरिकांची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये लेप्टोपायरोसिसचे १९, काेराेनाचे तीन, डेंग्यू आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण २६ रुग्ण आढळले आहेत.

महाड आणि पाेलादपूरमध्ये अतिवृष्टीने पूर, दरडी काेसळल्या हाेत्या. महाड-तळीयेमध्ये दरड काेसळल्याने ८४ नागरिक डाेंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी ५३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित ३१ जणांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी आहे. तसेच पाेलादपूर-केवनाळे आणि सुतारवाडी येथेही ११ जणांचा दरडीखाली गुदमरुन मृत्यू झाला. त्याचवेळी महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्रीला महापूर आला. तब्बल १५ फुटांहून अधिक पाणी हाेते. आता महापूर ओसरला आहे. परंतु शहरासह अन्य भागांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरल्याने लवकरात लवकर स्वच्छता करण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासनापुढे आहे. स्वच्छता करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. राेगराई पसरू नये यासाठी विविध ठिकाणची १८ वैद्यकीय पथके महाडमध्ये तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत आतापर्यंत तब्बल १२ हजार ९३१ नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच एक हजार ४१६ जणांना टिटीचे इंजेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील काेराेनाचा प्रादुर्भाव थांबलेला नाही. त्यामुळे ३८० नागरिकांची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. त्यात तिघांना  काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले. लॅप्टाेपायरोसिसचे १९ रुग्ण तर डेंग्यू आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण २६ रुग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली. महाड, पाेलादपूरमध्ये साथी फैलावू नयेत यासाठी आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 

संसार वेचण्यात नागरिक गुंतलेले
महाडमध्ये सध्या नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर येत आहे. पुरात उघड्यावर पडलेला संसार वेचण्यात नागरिक अद्यापही गुंतलेले आहेत. अशा विचित्र परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नागरिक काेराेना नियमांचे पालन कसे करणार, असा प्रश्न आहे. दरम्यान, महाडमधील नागरिकांचा संसार उभा करतानाच या ठिकाणी साथराेग पसरू नये यासाठी सरकार आणि प्रशासनाला कठाेर मेहनत घ्यावी लागणार आहे.

Web Title: After the flood, Now Epidemic diseases crisis hit Mahad; The administration will have to work hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.