७० शाळा बंद होणार !
By Admin | Updated: May 8, 2016 02:52 IST2016-05-08T02:52:44+5:302016-05-08T02:52:44+5:30
कर्जत तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे शेकडो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कर्जत तालुक्यातील

७० शाळा बंद होणार !
- विजय मांडे, कर्जत
कर्जत तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे शेकडो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कर्जत तालुक्यातील २८१ शाळांपैकी ७० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या २० इतकीही नाही, तर काही गावांतील शाळेचा पट शून्य आहे. या शाळांमधील शिक्षकांचे वेतन सुरूच असल्याने शासनाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद कराव्यात, असा शासनाचा विचार आहे.
दिवसेंदिवस पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढत आहे. हल्ली गावागावात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळामंधील पटसंख्येवर त्याचा परिणाम जाणवत आहे. कर्जत तालुक्यात २८१ शाळा आहेत. २१ केंद्रप्रमुख शिक्षक मंजूर असताना १७ शिक्षक कार्यरत आहेत. पदोन्नती मुख्याध्यापक ३१ मंजूर असताना ५० कार्यरत आहेत. ६४६ उपशिक्षक मंजूर असताना ७३१ कार्यरत आहेत. १८५ पदवीधर शिक्षक मंजूर असताना केवळ ५१ पदवीधर शिक्षकच कार्यरत आहेत. असे एकूण ८३२ शिक्षक कार्यरत आहेत. अतिरिक्त मुख्याध्यापक ३१ आहेत, तर अतिरिक्त उपशिक्षक ११० आहेत आणि एकही पदवीधर शिक्षक अतिरिक्त नाही. याउलट रिक्त मुख्याध्यापकांची संख्या १३ आहे. रिक्त उपशिक्षकांची संख्या २५ आहे आणि रिक्त पदवीधर शिक्षकांची संख्या १३४ आहे. ही आकडेवारी २०१५- १६ ची असल्याचे गट शिक्षण अधिकारी सुरेश डंबाये यांनी सांगितली.
नुकतेच मुख्याध्यापक, शिक्षकांचे समायोजन झाल्याचेही सांगितले. २८१ शाळांपैकी ७० शाळांमधील विद्यार्थी पट २० पेक्षा कमी आहे. गारपोली गावातील शाळेचा विद्यार्थी पट शून्य आहे. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तसे घडल्यास त्या ७० शाळा कधीही बंद होऊ शकतात. त्यामुळे तेथील शिक्षकांचे काय करायचे, असा प्रश्न सुद्धा समोर येईल.
जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये चार किंवा पाच विद्यार्थी आहेत. शिक्षक दोन आहेत. त्यांच्या वेतनाचा विचार केल्यास त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किती खर्च येतो ते दिसते. आणि इतका खर्च करावा की शाळा बंद कराव्यात, हे शासनाला ठरवावे लागेल. काही शिक्षक विद्यार्थी कमी असल्याने आपापसात तडजोड करतात, असेही निदर्शनास आले आहे.
बदलीची शक्यता
गारपोली गावातील शाळेचा विद्यार्थी पट शून्य आहे. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तसे घडल्यास त्या ७० शाळा कधीही बंद होऊ शकतात.
या ठिकाणी कार्यरत शिक्षकांचे काय करायचे, असा प्रश्न सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. विद्यार्थी नसल्याने शिक्षकांची बदली होण्याची शक्यता आहे.
शिक्षणाच्या अधिकारांतर्गत शासनाने १९ पट असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास शाळा बंद कराव्या लागतील. त्यामुळे या शिक्षकांचे काय करायचे, ते सरकारला ठरवावे लागेल. मुख्याध्यापकांचे समायोजन पूर्ण झाले आहे. पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उप शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रि या सुरू आहे.
- सुरेश डंबाये,
गट शिक्षण अधिकारी, कर्जत
शून्य विद्यार्थी पटाच्या शाळा बंद करायच्या की नाही ते सरकारने ठरवावे, मात्र एक विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करू नये. त्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे.
- मनोहर थोरवे, उप सभापती,
कर्जत पंचायत समिती