रस्त्याचे ६५ कोटी खड्ड्यात
By Admin | Updated: July 24, 2015 03:24 IST2015-07-24T03:24:33+5:302015-07-24T03:24:33+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-खोपोली राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. मे २०१५ मध्ये

रस्त्याचे ६५ कोटी खड्ड्यात
विजय मांडे , कर्जत
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-खोपोली राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. मे २०१५ मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे प्राधिकरणाने जाहीर केले होते. मात्र दोनच महिन्यांत मार्गाची दुर्दशा झाल्याने चौपदरीकरणासाठी खर्च करण्यात आलेले तब्बल ६५ कोटी खड्ड्यात गेल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
कल्याण-कर्जतपुढे खोपोली-हाळफाटा या राज्यमार्ग रस्त्याचे चौपदरीकरणाला नोव्हेंबर २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली. हे काम दोन वर्षांत होणे अपेक्षित असताना त्याला तब्बल दीड वर्षे उशीर झाला. मे २०१५ मध्ये एमएमआरडीएने रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले असले तरी मार्गावरील साईडपट्टी, स्पीडब्रेकर आदी कामे अपूर्ण असल्याचे दिसत आहे. याशिवाय पहिल्याच पावसात रस्त्याची दैना झाली असून खड्ड्यांमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या भरावामध्ये अवजड वाहने चिखलात फसत आहेत. कर्जत तालुक्यासह शेलू गावात आचार्य कॉलेजनंतर दामतकडे येताना रस्त्यावर साचणारे पाणी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. दामत गावाच्या नाक्यावर रस्त्यावरील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने मार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुढे नेरळ, ममदापूर नाका येथे गतिरोधक दोन्ही बाजूला खड्ड्यांनी भरले आहेत. चिंचवलीच्या वळणावर आणि डिकसळ भागातील खड्ड्यांची खोली जवळपास एक फूट असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.