शहरात कामगार असुरक्षित

By Admin | Updated: January 9, 2017 02:57 IST2017-01-09T02:57:44+5:302017-01-09T02:57:44+5:30

आधुनिक शहर म्हणून बिरुद मिरविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात बंदी असूनही बांधकाम जोरात सुरू आहेत. मात्र, या बांधकामावर काम करणाऱ्या

The workers in the city are unsafe | शहरात कामगार असुरक्षित

शहरात कामगार असुरक्षित

पिंपरी : आधुनिक शहर म्हणून बिरुद मिरविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात बंदी असूनही बांधकाम जोरात सुरू आहेत. मात्र, या बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही साधनसामग्री आणि उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र पाहायला आहे. त्यामुळे कामगारनगरी म्हणून ओळख असणाऱ्या या शहरातच कामगार सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा जाळ्या, हेल्मेट, बेल्ट, पॅड आदी साधने नसल्याने कामगारांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असूनही त्याकडे ठेकेदार आणि प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
उंच ठिकाणी काम करीत असताना इमारतीच्या बाहेरील बाजूस सुरक्षा जाळी, तसेच बेल्ट आवश्यक असूनही कामगारांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. बहुतांश कामगार उत्तर व दक्षिण भारतातील रहिवासी आहेत. खासगी ठेकेदारांमार्फत त्यांना कामे मिळवून दिली जातात.
बांधकामाच्या ठिकाणी कामगार पुरविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून ठेकेदाराशी करार करण्यात येतो. त्यानुसार बांधकाम प्रकल्पावर झालेल्या दुर्घटनेस ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येते. परिणामी, बांधकाम व्यावसायिक, ज्याला आपण काम दिले आहे, तो ठेकेदार करारातील नियमावली पाळतो की नाही, याची तपासणी न करता, काम लवकर कसे पूर्ण होईल हे पाहत असतो. त्याचवेळी ठेकेदार कामगारांवरील खर्चात जास्तीत जास्त कपात करून, नफा कमावण्याच्या दृष्टीने काम करीत असतो. हा सर्व प्रकार सुरू असताना पालिकेचे अधिकारीदेखील नेमके बांधकाम प्रकल्पावर नियमावलीनुसार काम सुरू आहे का, ते प्रत्यक्ष जाऊन पाहताना दिसत नाहीत. त्यांच्या या धोरणामुळे नाहक गोरगरीब मजुरांचा बळी जात आहे.
अपघात होऊन गंभीर जखमी, तसेच जीव जाण्याच्या घटना घडत असतानाही कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिक मात्र घटनेशी
काहीही संबंध नसल्यासारखे वागत असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अपघातांपासून धडा नाही
 बांधकाम करतेवेळी काही अपघात होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक असते. या सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने पाच महिन्यांपूर्वी बालेवाडी येथील प्राइड पर्पलच्या स्पार्क एक्स्प्रेस टाऊनशिपमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडूनही बहुतांश जागी कामगारांच्या सुरक्षेला हरताळ फासला जात असल्याचे चित्र शहरात सर्रास पाहायला मिळत आहे. रावेत, किवळे, वाकड, तळवडे, रुपीनगर अशा विविध भागात बांधकामे जोरात सुरू आहेत. यातील काही ठिकाणी सध्या स्लॅब टाकण्यात येत असून, येथे सुरक्षा जाळी लावणे आवश्यक आहे. मात्र, येथे बहुतांश ठिकाणी जाळी लावण्यात आलेली नाही. इमारतीच्या एका कोपऱ्यात फक्त नावाला जाळीचा एक तुकडा लावलेला दिसतो.

Web Title: The workers in the city are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.