महिलाही ठरताहेत सुसाट वेगाच्या बळी
By Admin | Updated: April 22, 2016 01:33 IST2016-04-22T01:33:28+5:302016-04-22T01:33:28+5:30
शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या शेकडो अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये महिला आणि विशेषत: तरुणींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे

महिलाही ठरताहेत सुसाट वेगाच्या बळी
पुणे : शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या शेकडो अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये महिला आणि विशेषत: तरुणींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात सिंहगड रस्त्यावर झालेल्या तरुणीच्या अपघातामुळे महिलांच्याही बेदरकार ‘ड्रायव्हिंग’चा मुद्दा चर्चेमध्ये आला आहे.
गाडीचा बेफाम सोडलेला अॅक्सिलेटर, वेगाची प्रचंड नशा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यामुळे पुण्यातील रस्त्यांवर महिला आणि तरुणींनाही प्राण गमवावे लागत आहेत. उपनगरातीलच नव्हे, तर शहराच्या मध्यवस्तीतही भरधाव जाणारी वाहने म्हणजे चालतीबोलती ‘किलिंग’ मशिन ठरत आहेत. पुण्यातील रस्त्यांवर गेल्या अडीच वर्षांत १५२ महिलांना प्राण गमवावे लागले आहेत.
वाहनचालकांमधील बेदरकार वृत्ती आणि वेगाची नशा या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. हीच नशा तरुणींमध्येही पाहायला मिळत आहे. महाविद्यालयांचा परिसर, बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवरून ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या तरुणी हमखास नजरेस पडतात. दुचाकीवर स्टंटबाजी करणेही अनेक तरुणींना महागात पडल्याचे पोलीस सांगतात.
रस्त्यांवरून गरोदर स्त्रिया, वृद्ध आणि रुग्ण नागरिक जात असतात. शाळकरी मुले, पादचारी यांचीही रस्त्यांवर वर्दळ असते. वाहनांपेक्षा रस्त्यांवर पहिला हक्क पायी जाणाऱ्याचा असतो. तो कायम असायला हवाच; परंतु बेदरकार वाहनचालक स्वत:च्या धुंदीत बेफाम जातात. तरुण वाहनचालकांकडून सर्रास होणारे वेगमर्यादेचे उल्लंघन ही नित्याचीच बाब झाली. वाहनचालकांचे आणि शिस्तीचे एकमेकांशी दूरदूरूनही नाते नाही की काय, अशीच परिस्थिती सध्या दिसते आहे. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे, नो एंट्रीत वाहने चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर न करणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे असे नियमभंग करतानाही महिला आढळून येतात. वाहनांचा उरात धडकी भरविणारा वेग अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करीत आहे. अनेक अपघातांत दोष नसताना घरातील कमावती व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. वाहन चालवताना संयम दाखविल्यास अपघात कमी होऊन होणारी जीवितहानी टळेल.