बारामतीत वाळूमाफियांचे गुंडाराज

By Admin | Updated: May 26, 2015 23:16 IST2015-05-26T23:16:28+5:302015-05-26T23:16:28+5:30

नीरा नदीच्या पात्रातील वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी आता बंधाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांचे नदी क्षेत्रामध्ये गुंडाराज सुरू आहे.

Wolfgang's gooseberry in Baramat | बारामतीत वाळूमाफियांचे गुंडाराज

बारामतीत वाळूमाफियांचे गुंडाराज

बारामती : नीरा नदीच्या पात्रातील वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी आता बंधाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांचे नदी क्षेत्रामध्ये गुंडाराज सुरू आहे. कांबळेश्वर (ता. बारामती) येथे वाळू काढण्यात बंधाऱ्यातील पाण्याचा अडसर होत असल्याने, वाळूमाफियांनी चक्क सुरुंगाद्वारे बंधाऱ्याचे दोन गाळेच उद्ध्वस्त केले. सोमवारी (दि. २५) रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. जिलेटिनचा वापर करून स्फोट घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सुरुंगाच्या आवाजाने परिसरातील शेतकरी, पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली तेव्हा हा प्रकार लक्षात आला.
कांबळेश्वर येथील नीरा नदीवरील बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यावर परिसरातील गावांच्या पाणी योजना, हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येथील पाणीसाठा उपयुक्त ठरत आहे. मात्र, या भागात वाळूमाफियांचा हैदोस सुरू आहे. राजरोसपणे येथून बेसुमार वाळूउपसा होत असतो. स्थानिक महसूल विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांकडे याबाबत येथील ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे धाडस वाढले आहे. कांबळेश्वर येथील बंधाऱ्यातील वाळू काढण्यासाठी बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्याचा अडसर होत असल्याने वाळूमाफियांनी सुरुंगाद्वारे बंधाऱ्याचे दोन गाळे उद्ध्वस्त केले. त्याचप्रमाणे आणखी एका गाळ्याचा तळातील ढापाही सुरुंगाद्वारे फोडला. त्यामुळे बंधाऱ्यातील लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाळूमाफियांच्या मुजोरीमुळे पाणी वाया
गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
या प्रकाराची माहिती रात्रपाळीवर काम करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना
कळवली. मंगळवारी (दि. २६) सकाळी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी बंधाऱ्याची पाहणी केली. तसेच घडलेल्या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले. (प्रतिनीधी)

४बारामती-इंदापूर परिसरातील नदी क्षेत्रामध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेसुमार अवैध वाळूउपसा सुरू आहे. रात्रंदिवस अवजड वाहनांमधून वाळूची बेकायदा वाहतूक होत असते. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
४नदीकाठच्या शेतकऱ्यांना नेहमीच वाळूमाफियांच्या अरेरावीचा सामना करावा लागतो. नदीकाठच्या शेतातून रस्ते तयार करून चोरटी वाळूवाहतूक होत असते. याबाबत स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याने महसूल विभाग, पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

४वाळूउपसा गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. मात्र, नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा केला जातो. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून नदी वाहत असल्यामुळे वाळूमाफियांचे फावते. या वाळूमाफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे.

Web Title: Wolfgang's gooseberry in Baramat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.