तोंडचे पाणी पळवितेय कोण?
By Admin | Updated: July 21, 2014 03:53 IST2014-07-21T03:53:05+5:302014-07-21T03:53:05+5:30
धरण उशाला कोरड घशाला’ अशी अवस्था पिंपरी-चिंचवडकरांची झाली आहे

तोंडचे पाणी पळवितेय कोण?
विश्वास मोरे, पिंपरी
‘धरण उशाला कोरड घशाला’ अशी अवस्था पिंपरी-चिंचवडकरांची झाली आहे. धरण क्षेत्रात आठवडाभरापासून पाऊस पडत असून, मावळातील नदी नाले-वाहू लागल्याने पवनेची पाणी पातळी वाढली आहे. एकीकडे नदीतून अमाप पाणी वाहून जात असताना टंचाईचे कारण पुढे करून दिवसाआड पाण्याचे संकट आणले आहे. शहरवासीयांच्या तोंडचे पाणी नक्की कोण पळवितेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाबाबत विरोधी पक्ष, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते मूग गिळून का बसलेत? जनतेच्या भावनांशी खेळून पाण्याचे राजकारण करणाऱ्यांनो ‘आता बास!’ म्हणण्याची वेळ आली आहे.
‘गाव ते महानगर’ अशी शहराची वाटचाल, वाढ स्तिमित करणारी आहे. राज्यातील सर्वाधिक वेगाने वाढणारे अशीही शहराची ओळख देशात आहे. सन १९६१ ला ३९ हजार ६५४ असलेली लोकसंख्या २०११ मध्ये १७ लाख २९ लाख ३९५ वर पोहोचली आणि २०१४ ला १८ लाखांवर पोहोचली आहे. शहराच्या स्थापनेपासून शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हा एकमेव जलस्रोत आहे. पाऊस लांबल्याने महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधी अशी बैठक होऊन पाणीकपातीचे नियोजन झाले. मात्र, रविवारपासून (दि. १३) मावळातील धरण क्षेत्रात पावसास सुरुवात झाली. धरणातील साठा वाढू लागला, तरी पाणीकपात वाढतच आहे. दिवसाआड आणि आता तर आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करावा लागणार, अशी भीती अधिकारी दाखवीत आहेत. यामागचा राजकीय सूत्रधार कोण, हे शोधण्याची गरज आहे.
धरणातून पाणी बंद, तरी पवना तुडुंब
धरणातून नदीत दिवसातून ६ तास १२०० क्युसेक पाणी सोडले जाते. पाऊस नसल्याने यात कपात करून १००० क्युसेक पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले. साधारणत: पाऊस सुरू झाला की, धरणातून पाणी सोडणे बंद केले जाते. त्यानुसार ५ दिवसांपासून नदीत पाणी सोडणे बंद केले आहे. कारण धरणाखाली असणाऱ्या ५० गावांमध्ये सध्या संततधार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील ब्राह्मणोली, वारू, मळवडी, महागाव बंधारा, शिवली, आर्डव, कडधे, करूज, बऊर, ओझर्डे, बेबडओहोळ या डोंगराळ भागातून ही नदी येत असल्याने दिवसाला ५ मिमी पाऊस पडला, तरी नदीतून बाराशे क्सुसेकपेक्षा अधिक पाणी वाहते, असे पाटंबधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.