शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्याची जबाबदारी कोणाची?
By Admin | Updated: April 6, 2016 01:20 IST2016-04-06T01:20:14+5:302016-04-06T01:20:14+5:30
पाणीकपातीचे धोरण महापालिका अवलंबित असताना पाण्याचा अपव्यय होण्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. महापालिका, एमआयडीसी

शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्याची जबाबदारी कोणाची?
पिंपरी : पाणीकपातीचे धोरण महापालिका अवलंबित असताना पाण्याचा अपव्यय होण्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. महापालिका, एमआयडीसी आणि प्राधिकरण परिसरात शासकीय कार्यालयातच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड झाले आहे. कारवाई करायची कोणावर, हा खरा प्रश्न आहे.
काही महिन्यांपासून महापालिकेने दिवसातून एकदा पाण्याचे नियोजन केले आहे. पाणीकपात माथी मारण्याचा प्रकार महापालिकेकडून सुरू आहे. परंतु, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांऐवजी शासकीय कार्यालयातच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड झाले आहे.
शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या हालचाली
दरम्यान, पुण्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडमध्येही दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. ११ डिसेंबर २०१५ पासून शहरात १० टक्के पाणीकपात करण्यात आली. यामुळे प्रतिदिन ४० ते ४५ एमएलडी पाण्याची बचत होऊ लागली. त्यानंतर पुन्हा ११ मार्च २०१६ ला आणखी पाच टक्के पाणी कपात केल्याने प्रतीदिन ७० ते ८० एमएलडी पाण्याची बचत होऊ लागली. सध्या प्रतिदिन ३८० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात आहे. मात्र, सध्या धरणक्षेत्रात केवळ ३२ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी) प्राधिकरणाच्या इमारतीची स्वच्छता
४पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने आकुर्डीतील रेल्वेस्थानकाजवळ ग्रीन बिल्डिंग तयार केली आहे. ग्रीन बिल्डिंगचे रेटिंग असणाऱ्या या इमारतीची स्वच्छता करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात होता. दुपारी बारा ते तीन या वेळेत प्लॅस्टिक पाइपच्या आधारे कर्मचारी इमारतीची स्वच्छता करीत होते. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याची तक्रार या परिसरातील जागरूक नागरिकांनी केली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.रिक्षा धुण्यात चालक दंग
४तळवडे-त्रिवेणीनगर रस्त्यावरील चर्चसमोरील जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने फवाऱ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत होती. याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारही केली. मात्र, कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यानच्या काळात फवाऱ्यांद्वारे उडणाऱ्या पाण्यात रस्त्याने ये-जा करणाऱ्या रिक्षा, टेम्पो थांबविण्यात येत होते. गाड्या धुण्याचे काम या परिसरातील चालक करीत होते. सुमारे तास-दोन तास हा प्रकार सुरू होता.