पुणे : आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांचा आधार होता. मात्र, आज सर्वसामान्यांची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोंडी होत आहे. देशाला या कोंडीतून बाहेर काढण्यासाठी नवा जयप्रकाश कोण होतोय? याची वाट पाहतोय. युद्धखोरीच्या वल्गनांमुळे देश नव्हे, तर संपूर्ण जगच युद्धाच्या छायेखाली आहे.अभिव्यक्तीसह सर्वच बाजूंनी होणाऱ्या कोंडीमुळे श्वास गुदमरतोय. सामान्यांचे केवळ मानसिकच नव्हे, तर सामाजिक जीवनमान घसरत चालले आहे. याकडे पाहण्यासाठी कोणी तयार नाही. देश एकीकडे विज्ञानाच्या वाटेवर असल्याचे सांगताना इतिहासातील कथा घेऊन दिशाभूल करणाऱ्या वल्गना गंभीर आहेत, अशी खंत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादली. या घटनेला आज बुधवारी (दि २५) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आणीबाणीचे साक्षीदार ठरलेले डॉ. आढाव यांनी आणीबाणीच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना उलगडल्या.
ते म्हणाले, आणीबाणीच्या काळात आम्ही आंदोलन करीत होतो. या आंदोलनाच्या निमित्ताने माझाही दोन महिन्यांनी तुरुंगात प्रवेश झाला. येरवड्यातील आतल्या बराकीत आम्हाला बंदिस्त करण्यात आले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्यानंतर देशभर मुस्कटदाबी सुरू होती.लोक त्याविरोधात उभे राहत होते, बोलत होते, निषेध करीत होते. सर्वांना जयप्रकाश नारायण यांचा आधार होता. आणीबाणीची आठवण करावी लागावी तीही प्रकर्षाने, हे खटकत आहे. पन्नास वर्षांपूर्वी देशाने जो अनुभव घेतला त्यापेक्षा अत्यंत वाईट अनुभव आज येत आहे. राज्यकर्त्यांची ही चाल असून मूलभूत प्रश्न डावलले जात आहेत. पुस्तकातील धडे बदलणे, भाषा वाद, शालेय अभ्यासक्रमात तीन भाषांचा समावेश यांसारख्या अनेक मुद्द्यांना महत्त्व दिले जात आहे. एकंदरीतच देशातील जीवनमान ढासळत चालले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांना निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी घातली. आत्ता नाही तर पुढे कधीच परत येता येणार नाही, अशी भीती त्यांना वाटत होती. दिल्लीत २५ जून १९७५ रोजी ‘सिंहासन छोडो’ अशी घोषणा देणारा मोर्चा काढण्यात आला होता. त्याच रात्री देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. त्यासाठी त्यांनी तत्काळ मध्यरात्री तत्कालीन राष्ट्रपती यांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. जयप्रकाश नारायण कुठे आहेत? हे विचारल्यानंतर त्यांनी कारागृहात आहेत आणि सुरक्षित आहेत, इतकाच संदेश दिला. आणीबाणी लागू झाल्यावर नागरिकांचे घटनात्मक मूलभूत अधिकार रद्द झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याने वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लागू झाली. भूमिगत असतानाच मला २ ऑक्टोबर १९७५ रोजी अटक झाली. येरवडा कारागृहात आम्ही चारशे राजबंदी अटकेत होतो. अखेर १९७७ मध्ये अचानक लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या अन् आम्ही तुरुंगातून सुटलो. कालांतराने इंदिरा गांधी यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी विदेशातील वृत्तपत्रांना मुलाखत देताना ही चूक मान्य केली होती.- कुमार सप्तर्षी, युकांद्रचे संस्थापक
१९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाली. त्याचवर्षी स्त्री मुक्ती वर्ष जाहीर झाले. मी तेव्हा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवत होते. आम्ही बरेच जाहीर कार्यक्रम घेत होते. पण, आम्हाला अधिकृत जाहीरपणे कुणी सांगितले नव्हते की कार्यक्रम घेऊ नका. आम्ही कार्यक्रम करू शकत होतो. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक शिथिलता आली होती. त्यांना शिस्त लागावी असे आदेश होते, तेव्हा विनोबा भावे यांनी अनुशासन पर्व असे म्हटले. त्यावेळी आमच्या प्राध्यापकांच्या मागण्या होत्या. त्यासाठी प्राध्यापकांनी अर्ज केले होते. पण, आमच्या अर्जाला सहा महिने शिक्षण खात्याने कोणतीही दाद दिली नाही. पण, आणीबाणीनंतर साचून राहिलेल्या कामांना गती दिली. शिथिल यंत्रणेला एक शिस्त आली. सरकारच्या विरोधात बोलण्याचे विषय नसतील, तर आडकाठी केली जात नसे. - डाॅ. तारा भवाळकर, साहित्य संमेलनाध्यक्ष