‘त्या’ बिल्डरला कोणाचे अभय?
By Admin | Updated: May 6, 2016 05:52 IST2016-05-06T05:52:13+5:302016-05-06T05:52:13+5:30
पुणे-नाशिक रस्त्यावर अयप्पा मंदिराजवळ असणाऱ्या ‘उत्सव होम्स’या गृहप्रकल्पावर बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळे दोन चिमुकल्यांचा बळी गेला.

‘त्या’ बिल्डरला कोणाचे अभय?
पिंपरी : पुणे-नाशिक रस्त्यावर अयप्पा मंदिराजवळ असणाऱ्या ‘उत्सव होम्स’या गृहप्रकल्पावर बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळे दोन चिमुकल्यांचा बळी गेला. या घटनेने शहर हळहळले. बहीण-भावाच्या मृत्यूने एका कुटुंबाची वाताहत झाली. घटनेनंतर कंत्राटदार भोजू रामलू जाधव व हनुमंत गोपाल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल झालेला नाही. कोणाच्या आशीवार्दाने बांधकाम व्यावसायिकाला अभय मिळत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळे जिवावर बेतण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. शहरात बांधकाम साइटवर मृत्युमुखी पडणाऱ्यांंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सुरक्षिततेची काळजी घेतली नाही म्हणून दर महिन्याला एका तरी मजुराचा मृत्यू आज शहरात होताना दिसत आहे. घटना घडल्यावर प्रत्येक वेळी कंत्राटदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करून जबाबदारी ढकलली जात आहे. बांधकाम व्यावसायिकांना अभय देण्याचा केविलवाणा प्रकार पुढे येऊ लागला आहे. राजकीय नेतेमंडळींचे या बांधकाम व्यावसायिकांशी ह्यजिव्हाळ्याचे संबंधह्ण असल्याने त्यांना वाचविण्यासाठी कंत्राटदारांना बळी दिले जाते. भोसरीतील उत्सव होम या साइटवर पुरेशी उपाययोजना केली नसल्यानेच ही घटना घडली. भोसरीच्या घटनेने क्रीट्या राठोडच्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच मोलमजुरीसाठी आलेल्या या दाम्पत्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. अनेक जीव अशा गलथान कारभारामुळे जात आहेत. पोलीस व महापालिका प्रशासन अशा किती घटनांची फक्त आकडेवारीच पाहत बसणार आहे. फक्त हळहळ व्यक्त करीत किती दिवस बसायचे, सर्वसामान्यांना न्याय देण्याचा असाच प्रकार कायम राहणार का?
प्रशासनाने याची वेळीच योग्य दखल घेतली व नियमबाह्य काम करणाऱ्या बिल्डरांना चाप लावला, तरच विराट व वैष्णवी राठोड या चिमुकल्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल अन्यथा मेगा सिटीकडून
ग्रीन सिटीकडे वाटचाल करणाऱ्या
या शहराला सर्वसामान्यांच्या
न्यायाचे वावडे असल्याचेच चित्र
पुढे येईल. (प्रतिनिधी)
सव्वादोन एकरामध्ये भोसरी उड्डाणपुलालगत हा गृहप्रकल्प सुरू असून, यामध्ये ११ मजल्यांचे पाच टॉवर आहेत. सध्या तीन बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. एक व दोन बीएचके फ्लॅट येथे बांधले आहेत. मात्र या बिल्डिंग उभ्या राहत असताना उंच काम करताना मजुरांना धोका होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आलेली दिसत नाही. या बिल्डिंगच्या खालीच मजुरांना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे मजुरांच्या सुरक्षेबरोबर त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची आहे. बांधकाम सुरू असतानाच त्याच ठिकाणी मजुरांना राहण्याची सोय करण्यात आलेली दिसत आहे.
नावापुरता फलक
बांधकाम करताना मजुरांना लागणारी हेल्मेट, बेल्ट, शूज, तसेच उंचावरून पडून अपघात होऊ नये म्हणून जाळी (नेट) अशा कोणत्याही साधनसामग्री दिसत नाहीत. मात्र, बांधकाम साइटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बांधकाम नियमावलीचा फलक लावण्यात आला आहे. तो फक्त नावापुरताच.
सोमवारी घडलेली घटना खूप दुदैर्वी आहे. बांधकामाचे काम कंत्राटदाराला दिले आहे. भरपाई देण्यास ते कमी पडल्यास बांधकाम व्यावसायिक म्हणून आम्ही भरपाई देणार आहोत. संबंधित कुटुंब हैद्राबादचे असून, ते अंत्य विधी साठी गेले आहेत. अंत्य विधीनंतर त्यांना बोलवले आहे. ते आल्या नंतर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.
- सतीश बन्सल, बांधकाम व्यावसायिक