पुणे : महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी २०१८ मध्ये समान पाणीपुरवठा योजना आणूनदेखील अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना आंदोलन करावे लागत आहे. ही बाब गंभीर असून, पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
विधान परिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५मध्ये ‘लक्षवेधी’ च्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात सदस्यांनी मागणी केल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक झाली. विधान परिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर, विधानमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपसचिव नगरविकास प्रियंका छापवाले उपस्थित होते.
सद्यस्थितीत पुणे पालिकेला १४ टीएमसी पाणी देण्याचा करार करण्यात आला आहे. नवीन ३४ गावांकरिता पाणीपुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी उपलब्ध करून देण्याचा करार करावा. सन २०१८ मध्ये सुरू झालेली ही पाणीपुरवठा योजना अद्याप अपुरी असून, गांभीर्याने नियोजन करून लवकरात लवकर हा पाणीप्रश्न सोडवावा, असे निदेश प्रा. राम शिंदे यांनी दिले.