पुणे : भारतीय जनता पक्षाला लोकसभेला मदत, विधानसभेला विरोध. आता महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरेंबरोबर युतीची चर्चा, तर त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल तास-दीड तासांची भेट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा असलेले अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या सतत अनिश्चित असलेल्या भूमिकांनी आता तळातील मनसेचे कार्यकर्ते, महापालिका निवडणुकीत आपण नक्की करायचे तरी काय? असा उद्वेगजनक सवाल करू लागले आहेत. त्रस्त झालेल्या या कार्यकर्त्यांना सांभाळताना पदाधिकाऱ्यांच्याही नाकीनऊ येत आहेत.
पुणे शहरात ही परिस्थिती फारच तीव्र झाली आहे. मनसेचे महापालिकेत तब्बल २९ नगरसेवक होते. त्याआधी अगदी सुरुवातीच्या काळातही त्यांनी ९ नगरसेवक निवडून आणले होते. ९ चे २९ झाले, मात्र या २९ जणांची महापालिकेतील सलग ५ वर्षे फक्त तटस्थ राहण्यात गेली. त्यामुळेच पंचवार्षिक मुदत संपताच मनसेला गळती लागली व २९ नगरसेवकांचे संघटन निवडणुकीनंतर अवघ्या २ नगरसेवकांवर आले. त्यातलेही एक नगरसेवक पक्ष सोडून गेले. इतकी पडझड होऊनही पुण्यात राज यांना मानणारा फार मोठा गट आहे. त्यातील अनेकांना महापालिका निवडणूक लढवायची आहे. सुरुवातीला भाजपबरोबर जावे या मताचे ते होते. मात्र, राज यांचा त्याबाबत काहीच निर्णय होत नव्हता. मग अचानक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जाण्याचा विषय निघाला. खुद्द राज यांनीच तो काढला. त्यानंतर जणू युती झालीच अशा समजामध्ये कार्यकर्ते होते, तर राज यांनी अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने सगळ्या इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले आहे.
मतांमध्ये परावर्तित होत नसली तरीही राज आजही गर्दी खेचणारे नेते आहेत. एखाद्या घटनेवर त्यांच्या प्रतिक्रियांना माध्यमांमध्ये आजही प्रसिद्धी दिली जाते. त्यामुळेच निवडून आलेला एकही लोकप्रतिनिधी पदरी नसतानाही त्यांनी आपल्याबरोबर यावे यासाठी दिल्लीपासून गल्लीत असलेल्या भाजपसह गोंधळलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही जवळपास प्रत्येक निवडणुकीत प्रयत्नशील असते. मात्र, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे निर्णय घेत गेल्याने त्यात मनसेच्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची चांगलीच होरपळ झाली आहे. आता महापालिका निवडणूक तोंडावर आली तरीही अजून राज यांचा काहीच निर्णय होत नसल्याने त्यांच्यापैकी अनेक जण वैतागले आहेत. त्यांच्यापैकीच काहींनी महापालिका निवडणुकीत आपण नक्की करणार तरी काय? असा त्रासिक प्रश्न केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मनसेच्या निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांना फारसा रस नव्हता. विधानसभेसाठी मात्र अनेक जण इच्छुक होते. राज यांनी लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा दिला. मात्र, विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. त्यात राज्यभरात त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. आता महापालिका निवडणुकीत मात्र त्यांच्याबरोबर असणाऱ्या अनेकांना रस आहे. राजकीय पक्षांचे काम करतो आहोत तर आपली लोकप्रियता तपासण्याची एक संधी म्हणूनच कार्यकर्त्यांकडून स्थानिक निवडणुकीकडे पाहिले जाते. मात्र, त्याबाबतीत काहीच निर्णय होत नसल्याने सगळे इच्छुक त्रस्त झाले आहेत.
आमची भांडणे महाराष्ट्रापेक्षा मोठी नाहीत’ असे सांगून आमचे नेते राज यांनी सकारात्मकता दाखवली आहे. आता समोरचा पक्ष काहीच करत नसेल तर त्यात मनसेचा दोष नाही. आमचा आमच्या नेत्याच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे, मनसैनिक त्रस्त झाले, पदाधिकारी वैतागले, इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले यात काहीही तथ्य नाही. मनसैनिक इतका लेचापेचा नाही. - योगेश खैरे, प्रदेश प्रवक्ते, मनसे