राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष का?
By Admin | Updated: March 22, 2016 01:54 IST2016-03-22T01:54:25+5:302016-03-22T01:54:25+5:30
काही वर्षांपूर्वीपर्यंत गुजरात राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नव्हते. पण संपूर्ण राज्यात पाइपलाइनद्वारे पाण्याचे जाळे उभे करण्यात आले

राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष का?
पुणे : काही वर्षांपूर्वीपर्यंत गुजरात राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते. लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नव्हते. पण संपूर्ण राज्यात पाइपलाइनद्वारे पाण्याचे जाळे उभे करण्यात आले. त्यासाठी केवळ ५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि संपूर्ण गुजरात पाण्याच्या बाबतीत सक्षम झाला. असे असताना महाराष्ट्रात सिंचनासाठी गेल्या काही वर्षांत ७० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, असे का, असा सवाल ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी विचारला.
द इन्स्टिट्यूटशन आॅफ इंजिनिअर्स, इंडियन वॉटर वर्कस असोसिएशन, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, मराठी विद्या प्रतिष्ठान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी ‘पाणी चांगल्या नोकरीसाठी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी गुजरात राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आर. एस. सोलंकी, संघटनांचे प्रमुख विजय घोगरे, आर. व्ही. सराफ, प्रवीण बोरा, बी. डी. यमगर, मंगेश कश्यप आदी उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले, की गुजरात राज्यात हे पाण्याचे जाळे उभारण्यासाठी महाराष्ट्रातून जलतज्ज्ञ, अभियंते गेले आणि त्यांच्या कल्पनेतून हे जाळे उभे राहिले. केवळ ५ हजार कोटी रुपयांमध्ये गुजरातच्या सर्व भागांमध्ये पाणी पोहोचले. पण महाराष्ट्रात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपये खर्च करूनही आतापर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष संपलेले नाही. यामागे केवळ प्रभावी अमंलबजावणीची कमी, हेच एकमेव कारण दिसून येते. गुजरातमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी ही योजना राबविण्याची त्याची अंमलबजावणी करण्याची जबर इच्छाशक्ती होती. त्यातूनच हे शक्य झाले. पण महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी आणि जबर इच्छाशक्तीच नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र आजही पाण्याच्या बाबतीत गुजरातच्या मागे आहे.
सोलंकी यांनी गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या जाळ्याची माहिती दिली. ते म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मैलोन्मैल जावे लागत होते. तरीही पाणी मिळत नव्हते. अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार होत होते. ते रोखण्यासाठी आणि प्रत्येकाला घरी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मोठी योजना हाती घेतली.
याअंतर्गत राज्यात सव्वा
लाख किलोमीटरचे पाण्याच्या पाइपचे जाळे टाकण्यात आले. शुद्धीकरण, साठवणुकीचे प्रकल्प उभारण्यात आले. त्या
माध्यमातून प्रत्येकाच्या घरासमोर पाण्याचा नळ आला. नर्मदा
धरण आणि इतर धरण,
सरोवरांच्या माध्यमातून हे पाणी संपूर्ण राज्यात पोहोचविले गेले. आज ८२ टक्के नागरिकांच्या घरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळ
पोहोचला आहे.