‘राजू शेट्टींचे नाव आम्ही वगळले नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST2021-09-05T04:15:43+5:302021-09-05T04:15:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “राजू शेट्टी यांचे नाव आम्ही वगळलेले नाही. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ...

'We did not omit Raju Shetty's name' | ‘राजू शेट्टींचे नाव आम्ही वगळले नाही’

‘राजू शेट्टींचे नाव आम्ही वगळले नाही’

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “राजू शेट्टी यांचे नाव आम्ही वगळलेले नाही. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे दिलेल्या यादीत त्यांचे नाव आहे,” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शेट्टी नाराज असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात विचारले असता पवार म्हणाले, “शेट्टी नाराज आहेत का हे मला माहिती नाही. त्यांनी कोणती भूमिका घेतली असेल तर त्याबद्दल मला कल्पना नाही.” महापालिकेच्या शाळेचे उद्घाटन केल्यानंतर शनिवारी (दि. ४) ते पत्रकारांशी बोलत होते.

महाआघाडी सरकारने विधान परिषदेवरील बारा सदस्यांच्या निवडीसाठीची बारा जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली आहे. मात्र, गेल्या सुमारे वर्षभराच्या कालावधीत यावर निर्णय झालेला नाही. त्यातच तीन दिवसांपूर्वी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शेट्टी यांनीही नाराजी व्यक्त केली. मात्र, शेट्टी यांचे नाव वगळले नसल्याचे स्पष्ट करत शरद पवार यांनी या वादंगाला पूर्णविराम दिला.

पवार म्हणाले की, राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबाबत मला काही म्हणायचे नाही. ‘राष्ट्रवादी’कडून जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यपालांना दिली त्यात त्यांचे नाव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो आहोत.

चौकट

केंद्राच्या सूचना महत्त्वाच्या

भाजपा, मनसे यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णाा हजारे यांनी मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, “केंद्र सरकारने खबरदारी घेण्यासंदर्भातल्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. अन्य घटकांची मते काय आहेत यापेक्षा केंद्राच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.” माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरू असणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईबद्दल ते म्हणाले की, महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यातही ईडीचा गैरवापर सुरू आहे. या माध्यमातून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. ईडीचा असा गैरवापर यापूर्वी कधीही झाला नव्हता.

Web Title: 'We did not omit Raju Shetty's name'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.