विजेअभावी पाणीपुरवठा ठप्प
By Admin | Updated: May 28, 2014 00:29 IST2014-05-28T00:29:21+5:302014-05-28T00:29:21+5:30
गावातील ट्रान्सफॉर्मर मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गावचा नळपाणीपुरवठाही बंद पडला आहे. महिलांना भर उन्हाळ्यात दीड किलोमीटरवर असणार्या गावच्या विहिरीवरून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

विजेअभावी पाणीपुरवठा ठप्प
भोर : पान्हवळ (ता. भोर) गावातील ट्रान्सफॉर्मर मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गावचा नळपाणीपुरवठाही बंद पडला आहे. महिलांना भर उन्हाळ्यात दीड किलोमीटरवर असणार्या गावच्या विहिरीवरून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. वारंवार ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी करुनही वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होते. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महिलांना भर उन्हातान्हात पाण्यासाठी दीड किलोमीटरवर असणार्या गावाच्या विहिरीवरुन डोक्यावरुन पाणी आणावे लागते. भर उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने महिलांसह गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आंबवडे खोर्यातील आंबवडे, नाझरे, म्हाकोशी, कर्नावड, रावडी, चिखलगाव, हिटेघर कोलै वडतुंबी, घोरपडेवाडी या गावामध्येही २१ तारखेपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे म्हाकोशी बंधार्यातून शेतीला व पिण्याचा पाण्याचा नळपाणीपुरवठा योजना बंद आहेत. पाणी समोर असूनही नळ विजेअभावी ते उचलता येत नाही. त्यामुळे शेतातील पीके जळून जात असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशीच अवस्था हिर्डोशी खोर्यातील गावामध्ये सुरु आहे. याकडे वीजवितरण कंपनीने लक्ष देण्याची खरी गरज आहे. अन्यथा कंपनीचा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.