पवना, आंद्रा धरणात पाणीसाठा वाढला
By Admin | Updated: June 25, 2015 03:32 IST2015-06-25T03:32:42+5:302015-06-25T03:32:42+5:30
आठवडाभरात कोसळलेल्या पावसाने मावळ तालुक्यातील जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात

पवना, आंद्रा धरणात पाणीसाठा वाढला
पिंपरी : आठवडाभरात कोसळलेल्या पावसाने मावळ तालुक्यातील जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ ते २४ जून या कालावधीत ४२७ मिमी पाऊस झाला आहे, तर इंद्रायणी नदीला पाणीपुरवठा होणाऱ्या आंद्रा धरणक्षेत्रातही २५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
पावसाळा लवकर सुरूहोईल, असे हवामान खात्याचे भाकीत अंशत: खरे ठरले. त्यामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये असमान पाऊस होत असल्याचा प्रत्यय सुरुवातीच्या पंधरवड्यात आला. त्यामुळे काही भागात चांगला पाऊस तर दक्षिण भागातील दिवड ओव्हळे खोऱ्यामध्ये पावसाची प्रतीक्षा असे चित्र होते. परिणामी धूळवाफेवर पेरणी झालेल्या भातरोपांची उगवणही झाली नसल्याने शेतकरी काळजीत होते. दरम्यान, या आठवड्यात सलग तीन दिवस पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ पर्यंत पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १५३ मिमी पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आहे. पाणीपातळीत वाढ होऊन पाणीसाठा ११७.८५ दलघमी झाला आहे. त्यापैकी ८६.७० पाणीसाठा उपयुक्त आहे. आंद्रा धरणक्षेत्रात १ जूनपासून २५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ५१.६१ दलघमी पाणीसाठा असून, त्यापैकी ५१.०५ दलघमी पाणीसाठा उपयुक्त आहे. पुण्यामध्ये जूनमध्ये आजवर २०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत मावळ तालुक्यात दुप्पट पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)