इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:56+5:302021-02-05T05:04:56+5:30
विजय मु-हे कुरुळी : तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदी भागातील चिखली, मोई, मोशी, कुरुळी,चिंबळी, केळगाव आदी भागात ...

इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
विजय मु-हे
कुरुळी : तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदी भागातील चिखली, मोई, मोशी, कुरुळी,चिंबळी, केळगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे नदीचे प्रदूषण मोठया प्रमाणावर वाढले असून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीच्या आजूबाजूच्या परिसरात यामुळे दुर्गंधी पसरली आहे. जलचर प्राणी व नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नदीमध्ये सोडण्यात आलेल्या गटारांमुळे पाणी दूषित झाले आहे. रब्बी हंगामात नदीकाठच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कांदा. ऊस. ज्वारी. बटाटा. गहू. मका. पालेभाज्या आदी पिकांचे उत्पन्न घेतले आहे. या पिकांना नदीचे पाणी देताना त्यांच्या हातापायाला खाज येणे, डास चावल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी नदीपात्रात प्रशासक प्रशासनाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. मात्र तोकड्या यंत्रणेमुळे इंद्रायणीच्या जलपर्णीची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. इंद्रायणी नदीत थेट ओढ्या-नाल्यातून दूषित आणि रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत येत असल्याने जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी शासनाने प्रभावी योजना राबवण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
इंद्रायणी नदीवरील पुलावरून ठिकठिकाणी नागरिक कचरा, प्लास्टिक, राडारोडा, नदीपात्रात बिनधास्तपणे टाकतात त्यांच्यावर देखील प्रशासनाने कारवाई करावी.
शांताराम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते
कुरुळी: (ता. खेड) परिसरात इंद्रायणी नदीवर पसरलेली जलपर्णी