हवेली, दौंड, इंदापूरमध्ये आले पाणी
By Admin | Updated: February 7, 2016 03:36 IST2016-02-07T03:36:06+5:302016-02-07T03:36:06+5:30
१९७२च्या भीषण दुष्काळानंतर प्रथमच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते परंतु सध्या नवीन

हवेली, दौंड, इंदापूरमध्ये आले पाणी
लोणी काळभोर : १९७२च्या भीषण दुष्काळानंतर प्रथमच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते परंतु सध्या नवीन व जुना मुठा या दोन्ही कालव्यांना पाणी आल्यामुळे तीनही तालुक्यांत आनंदाला उधाण आले आहे.
खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी दौंड तालुक्यात दाखल झाले आहे. दौंड, इंदापूर, हवेली या तालुक्यांसाठी आणि जनाई उपसा सिंचन योजनेसाठी हे पाणी सोडण्यात आले असून, खडकवासला धरणातून १.२ ते १.४ टीएमसी पाणी आवश्यकतेनुसार सोडण्यात येत आहे. हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यांना पिण्याची पाण्याची ऐन उन्हाळ्यात भेडसावणारी समस्या यामुळे काही अंशी का होईना दूर होण्यास मदत होणार आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठी असून शेतकऱ्यांना शेती सिंचनसाठी घेता येणार नाही. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी याकडे लक्ष ठेवून कालव्याच्या कडेचा विद्युत पुरवठा खंडित करताना दिसत आहेत. पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत जलसंपदा विभागासह, महसूल व वीज वितरण कंपनी आणि पोलीस अधिकारी यांनी आवश्यक उपाययोजना केल्यास पाणीगळती रोखून बचत होईल. त्यानंतरच पुन्हा दौंड आणि इंदापूरसाठी दुसरे आवर्तन देणे शक्य होईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चालू पावसाळ्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी असताना पावसाच्या कमतरतेमुळे या धरणांमध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा झाला. परिणामी गेले तीन महिने नवा मुठा उजव्या कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आले होते. पाटबंधारे विभाग व पुणे महानगरपालिका यांच्या मध्ये १९९७मध्ये झालेल्या एका करारानुसार पुणेसह ११़५० टीएमसी सांडपाणी मुळा-मुठा नदीतून उचलून मुंढवा येथे या पाण्यावर प्रक्रिया करायची. नंतर हे पाणी जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पाणीपुरवठा करायचा असा करार झाला असताना; मात्र या पाण्यावर कसलीही प्रक्रिया न करता जसेच्या तसे जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून मलजल व रसायनयुक्त पाणी शेतीला पुरविण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. या पाण्याचा दर्जा निकृष्ट असूनही दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी हे पाणी गुपचूप स्वीकारले आहे. परंतु जून महिन्यात पर्जन्यराजाचे जोरदार आगमन झाले तर बळीराजा या पाण्याला जोरदार विरोध करणार ही शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)
पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यांतील सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला पाणीपुरवठा करताना झुकते माप मिळणार नाही हे गृहीत धरून शेतकऱ्यांनी पाण्याची आशा सोडली होती. मात्र या वेळी शेतीला पाणी मिळाले. आता नवा मुठा उजव्या कालव्याला इंदापूर व दौंड तालुक्याला पिण्यासाठी १.६0 टीएमसी पाणी मंजूर झाले आहे. दि. ५ फेब्रुवारीपासून हे पाणी कालव्यात सोडले आहे.
साधारण पंधरा दिवस जरी कालव्यामधून हे पाणी वाहिले तर पाणी वाहणे बंद झाल्यानंतर साधारण दीड ते दोन महिने या तीनही तालुक्यांतील विहिरी व कूपनलिकांना भरपूर पाणी राहणार आहे. तसेच आगामी दोन महिने या परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणार आहे.