रासायनिक उद्योगावर पाणी कपातीची टांगती तलवार
By Admin | Updated: September 3, 2015 03:09 IST2015-09-03T03:09:53+5:302015-09-03T03:09:53+5:30
येथील औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांवर पाणीकपातीची टांगती तलवार लटकत आहे. राज्य सरकारने उद्योगांना पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे उद्योजकांची धावपळ सुरू झाली आहे.

रासायनिक उद्योगावर पाणी कपातीची टांगती तलवार
कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांवर पाणीकपातीची टांगती तलवार लटकत आहे. राज्य सरकारने उद्योगांना पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे उद्योजकांची धावपळ सुरू झाली आहे.
बुधवार (दि. २) रोजी ‘लोकमत’मधील वृत्तामुळे उद्योजकांनी उपअभियंता, कुरकुंभ यांच्याकडे धाव घेतली. कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांना वरवंडच्या व्हिक्टोरिया तलावातून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये आता ११४ दशलक्ष घनफूट (६० टक्के) पाणीसाठा आहे. तसेच, या तलावातून जानाई-सिरसाई योजनेलादेखील पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
कुरकुंभ येथील औद्योगिक विभाग हा रासायनिक प्रकल्प असून, त्यासाठी रोज जवळपास ६ ते ७ हजार घनमीटर पाण्याचा वापर होत असतो; परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेती-व्यवसाय, औद्योगिक व्यवसाय, पिण्याच्या पाण्याच्या; तसेच सर्वच स्तरावरील पाणी वापरावरच निर्बंध आला आहे. परिणामी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील काळात पाण्याच्या कमतरतेमुळे उद्योगांवर मोठ्या प्रमाणात अवकळा पसरली होती. पाण्याच्या व्यवस्थेसाठी खासगी बोअरवेल, विहिंरीमधून पाणी विकत घेऊन उद्योग चालविण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळेसदेखील तशीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
(वार्ताहर)
दौंड : पावसाने पाठ फिरविल्याने महाराष्ट्रात सर्वत्र पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी दौंड येथील अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, वीरधवल बाबा जगदाळे युवा मंच आणि छत्रपती डी. जे. ग्रुप यांच्या वतीने दौंड येथील महादेव गल्लीतील महादेवास महारुद्र अभिषेक घालण्यात आला.
या वेळी दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. अभिषेकाचे पौरोहित्य अतुल गटणे यांनी केले, तर अभिषेक अविनाश गाठे, राहुल क्षीरसागर, मयूर खेडगीकर, राहुल पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी विक्रम पवार, गौरव साळुुंखे, हरीश ओझा, गणेश घोलप, अविनाश जगदाळे, सुबोध सुरवसे, सौरभ पगारिया, आनंद गटणे, अजय जाधव, वैभव कदम, मयूरेश दिघे, मनोज हिरणावळे, कृष्णा लड्डा, अनिकेत विधाते यासह नागरिक उपस्थित होते.
कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी म्हणून अग्रगण्य अशा सणसवाडी येथील पाच कोटी पंचेचाळीस लाखांच्या शुद्ध पाणी प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असल्याने ग्रामस्थांना आता थोड्याच दिवसांत शुद्ध पाणी मिळणार असल्याचे सरपंच वर्षा कानडे व उपसरपंच युवराज दरेकर यांनी सांगितले.
सणसवाडी गावची लोकसंख्या सुमारे १२ हजार आहे. परंतु याठिकाणी प्रत्यक्षात ३० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी पाण्याचा स्रोत हा पारंपरिक होता. ग्रामपंचायत कार्यकारिणीने वढू बुद्रुक येथील बंधाऱ्यातून पाणी आणून त्यावर आर. ओ. फिल्टर बसवण्याचा निर्णय घेतला. त्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुरीही मिळवण्यात यश आले असून, पाच कोटी ४५ लाख रुपयांच्या प्रकल्पाचे कामही प्रत्यक्षात सुुरू झाले. वढू बुद्रुक येथील बंधाऱ्याजवळ जॅक्वेल विहिरीचे कामही अंतिम टप्प्यात आले असून, वढू बुद्रुक ते सणसवाडी या सात किलोमीटर अंतरामध्ये पाईपलाईन टाकण्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला आहे.
या वेळी विंधनविहिरीचे प्रगतिपथावर असलेले काम व सात किलोमीटर पाईपलाईनच्या कामाची पाहणी सरपंच वर्षा कानडे, उपसरपंच युवराज दरेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भुजबळ, बाबासाहेब दरेकर, रमेश सातपुते, राहुल दरेकर, गणेश दरेकर, अश्विनी दरेकर, सुनीता दरेकर, आशा दरेकर, ललीता भुजबळ व ग्रामविकास अधिकारी जी. एस. शेलार आदी उपस्थित होते. या वेळी सणसवाडी येथील शुद्ध पाणी प्रकल्प दहा महिन्यांत कार्यान्वित करून ग्रामस्थांना शुद्ध पाणी प्रामुख्याने देणार असल्याचे सरपंच वर्षा कानडे व उपसरपंच युवराज दरेकर यांनी सांगितले.
वाघापूर : पुरंदरचा पूर्व भाग हा जिरायती पट्टा म्हणून ओळखला जातो. या परिसरातील वाघापूर, गुऱ्होळी, राजेवाडी, सिंगापूर या गावांतील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदाही पावसाने ओढ दिल्याने व नदी, नाले, ओढे कोरडे पडल्याने विहिरींनी तळ गाठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
तीव्र पाणीटंचाईमुळे व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पूर्व भागात खरीप हंगामाच्या सुरुवातीला
पेरणी केलेली बाजरी, वाटाणा, भुईमूग, घेवडा, मूग, उडीद, पावटा ही पिके पाणीटंचाईमुळे जळून गेल्याचे पाहावयास मिळते. तर, जनावरांच्या
चाऱ्याचीदेखील समस्या अत्यंत गंभीर झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नैसर्गिक हवामानबदलाचा थेट परिणाम शेतीक्षेत्रावर होत असल्याने व शेती हाच आर्थिक उन्नतीचा केंद्रबिंदू असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक विंवचनेत सापडला आहे. या पूर्व भागातील परिसराला महत्त्वपूर्ण असलेल्या पुुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. विहिरीच्या पाण्यावर सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी पिके घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात येणार कुठून?’ अशी दयनीय अवस्था झाली आहे.
वरवंड : पडवी (ता. दौंड) परिसरात रस्त्याच्या कडेला कठडा नसलेली विहीर असून, ही विहीर अपघाताला आमंत्रण देत असल्याची वस्तुस्थिी आहे.
पडवी ते पडवी पाटी दरम्यान असणाऱ्या ओढ्याच्या जवळ रस्त्यालगतच ही विहीर आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना ही विहीर लक्षात येत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या विहिरीला सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना केली नाही. परिणामी विहिरीला संरक्षण कठडे नाही. या विहिरीच्या परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी बऱ्याचदा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.