रेल्वे उड्डाणपुलाची प्रतीक्षा संपेना
By Admin | Updated: January 10, 2017 03:43 IST2017-01-10T03:43:14+5:302017-01-10T03:43:14+5:30
मांजरी बुद्रुक येथील रेल्वेगेट सतत बंद होत असल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे कामगार, शालेय विद्यार्थी यांना वेळेवर

रेल्वे उड्डाणपुलाची प्रतीक्षा संपेना
मांजरी : मांजरी बुद्रुक येथील रेल्वेगेट सतत बंद होत असल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे कामगार, शालेय विद्यार्थी यांना वेळेवर पोहोचता येत नाही.
लोकप्रतिनिधींनी अनेकदा येथील रेल्वेगेटची पाहणी करून भेटी दिल्या. भूमिपूजन होऊन उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार असल्याचे येथील नागरिक ऐकत आहेत. लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या की लगेच काम मार्गी लागणार अशी परिसरात चर्चा होते. परंतु त्यावर आता नागरिकांचा विश्वास राहिला नाही. तीन वेळा भूमिपूजन झाले आहे; परंतू रेल्वे उड्डाणपूल काही झाला नाही. कामास शासनाकडून मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही.
मांजरी, हडपसर, आव्हाळवाडी, वाघोली, केसनंद, कोलवडी, साष्टे, थेऊर, शेवाळेवाडी, साडेसतरानळी या गावांकडे जाण्यासाठी सोपा आणि शॉर्टकट मार्ग असल्याने या भागातून रहदारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रेल्वेगेट लागल्यास एक एक किलोमीटर या अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यात अरुंद रस्ता व रस्त्यावर असणारी मोठी वाहने यामध्ये ट्रक, डंपर, वाळूच्या गाड्या भरधाव वेगाने या परिसरातून जात असतात. त्यामुळे अशा वाहनांचा वावर परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रेल्वेगेट उघडल्यास प्रत्येक जण गर्दीतून लवकर बाहेर पडेल याचीच स्पर्धा पाहायला मिळते. त्यात अनेक वेळा वाहने एकमेकांना घासून वाहनचालकांमध्ये वाद, तंटे निर्माण होतात. समोरच्या, बाजूच्या गाड्या बाहेर निघत नाहीत तोच परत रेल्वेगेट लागते. अशा प्रकारे सतत रेल्वेगेट लागत असल्याने या भागातून रहदारी करणारे नागरिक हैराण झाले आहेत.