पूर्व पुण्याला पाण्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 5, 2015 00:54 IST2015-01-05T00:54:30+5:302015-01-05T00:54:30+5:30
भामा-आसखेड धरणातून वडगाव शेरी मतदारसंघात पाणी आणण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वल्गना करण्यात आल्या

पूर्व पुण्याला पाण्याची प्रतीक्षा
विशाल दरगुडे, वडगाव शेरी
भामा-आसखेड धरणातून वडगाव शेरी मतदारसंघात पाणी आणण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वल्गना करण्यात आल्या. परंतु, निवडणुका पार पडल्यानंतर धरणातून पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीला अडथळ््यांची शर्यत करावी लागत आहे. भूसंपादनामुळे अनेक ठिकाणी कामे रखडल्याने वडगाव शेरी व नगर रस्ता परिसरातील नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागणार आहे.
पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून सुमारे ३८० कोटींची भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना मंजूर केली आहे. त्यासाठी केंद्र ५० , राज्य शासनाकडून २० व पालिका ३० टक्के वाटा उचलणार आहे. जून २०१४ प्रकल्पाला सुरुवात झाली. जून २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. साधारणत: भामा आसखेड धरणापासून ४२ किलोमीटर अंतरातून बंदिस्त वहिनीद्वारे २.८ टीएमसी पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे मुख्य नगर रोडवरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर या भागातील नागरिकांचा २०४१ पर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटणार असून, नागरिकांची टँकरमाफियांच्या कचाट्यातून सुटका होणार आहे.
काही दिवसांपूर्वी वनविभागाने भूसंपादनास परवानगी दिली. मात्र, खासगी जागेतून जलवाहिनी टाकण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. भूसंपादनाअभावी योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. भामा-आसखेड धरणग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा, त्यानंतर प्रकल्प राबवा, अशी भूमिका धरणग्रस्त शेतकऱ्यांनी घेऊन जलवाहिनी टाकण्याचे काम बंद पाडले आहे.
बंदिस्त जलवाहिनीस तीव्र विरोध झाल्यानंतर भामा-आसखेडमधून पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्प अडचणीत आला आहे.