बारामतीत हिंसक वळण
By Admin | Updated: August 15, 2014 01:02 IST2014-08-15T01:02:12+5:302014-08-15T01:02:12+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरूवारी झालेल्या ‘चक्का जाम’ आंदोलनाला बारामतीत हिंसक वळण लागले.

बारामतीत हिंसक वळण
बारामती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरूवारी झालेल्या ‘चक्का जाम’ आंदोलनाला बारामतीत हिंसक वळण लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग बंगल्यासमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी बाजारपेठा बंद करण्यासाठी जबरदस्ती केली. शहरातील दुकानांच्या काचा फोडल्या. एसटी बसगाड्यांवर दगडफेक केली. बारामतीच्या माजी नगराध्यक्षांची मोटारही फोडली. येथील जुन्या मंडईत दुकाने जबरदस्तीने बंद करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यावर आंदोलक तरुणांनी बेभान होऊन दारू विक्रीचे दुकान तोडले. आंदोलन चिघळत असल्याचे चित्र दिसल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे हाताबाहेर जात असलेली परिस्थिती आटोक्यात आली. धनगर आरक्षण कृती समितीच्या नेत्यांनी आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली होती. आंदोलनाला राष्ट्रीय समाजपक्षाने पाठिंबा दिला होता. या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटीच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर
रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांबरोबरच मेंढ्या देखील रस्त्यावर आणल्या होत्या.
जवळपास २ तास रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी आमदार विजयराव मोरे, दशरथ राऊत, किशोर मासाळ यांच्यासह कृती समितीचे नेते अॅड. जी. बी. गावडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी े आंदोलनाचे नेतृत्व केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोरच आंदोलन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
उर्वरित आंदोलक बारामती शहरात दाखल झाले. त्यांनी थेट दुकाने बंद करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे व्यापाऱ्यांसह आज बाजार दिवशी खरेदीला आलेल्या ग्राहकांची देखील धावपळ उडाली. तरी देखील झटपट दुकाने बंद झाली.
मात्र, येथील मोता कापड दुकानांसह अन्य दुकानांच्या काचांवर दगडफेक झाल्याने पोलिसांचे देखील धावपळ उडाली.
उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम अन्य अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांवर लाठीचार्ज करुन त्यांना
पांगवल्यानंतर तणाव काहीसा निवळला. (प्रतिनिधी)