वाल्हे : गुंजवणी जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम १९९३ च्या जुन्या सर्व्हेप्रमाणे होत नसल्याच्या कारणास्तव, वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामस्थांनी गुंजवणी प्रकल्पाचे काम रविवार (दि. २५) रोजी बंद पाडले होते. यासंदर्भात आढावा बैठक व शेतकरी वर्गाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, संबंधित विभागाचे अधिकारीवर्ग व वाल्हे व परिसरातील शेतकरीवर्ग यांची बैठक वाल्हे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत गुंजवणी बंदिस्त जलवाहिनीचे काम १९९३ च्या प्रवाही कालव्याच्या सर्वेनुसार करण्यावरच येथील शेतकरी ठाम राहिल्याने, उपस्थित अधिकारी वर्गाचे मत जाणून घेण्यात रस नसल्याने, ही बैठक निष्फळ ठरली आहे. यावेळी, सचिन लंबाते, बाळासाहेब राऊत, अॅड. फत्तेसिंह पवार, विक्रमसिंह भोसले, संभाजी पवार, उमेश पवार, रामदास राउत, डी. एन. पवार, महेंद्र पवार, सविता भुजबळ, राजसिंह पवार, ह.भ.प. माणिक महाराज पवार, कांतीलाल भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, शांताराम पवार उपस्थित होते.
सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कामानुसार, किती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे ? लाभक्षेत्राला ठिबक सिंचनने पाणी देण्यात येणार आहे का? जुन्या खुल्या प्रवाही कालव्याच्या सर्वेनुसार पाणी सर्वच लाभक्षेत्राला मिळणार का?, तसेच लाभक्षेत्रातील गावातील सर्व जमीन ओलिताखाली आल्याशिवाय, मूळ प्रकल्पात समाविष्ट नसलेली नारायणपर उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा; शेतकऱ्यांना भूमिगत पाइपलाइनवर कायमस्वरूपी कोणतेही बांधकाम अगर इतर विकास करता येणार नसल्यामुळे सदर योजनेतील पाइपलाइन करताना रीतसर जमीन संपादित करण्यात येऊन बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी; अगोदर कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता सदरच्या योजनेतील ठिबक सिंचनाचा हेक्टरी दीड लाख रुपये खर्च शासनाने स्वतः करावा. अशा विविध मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या होत्या.
कार्यकारी अभियंता स्वप्निल कुडूलकर, सहायक अभियंता नयन गिरमे यांनी देखील उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. १९९३ खुल्या प्रवाही कालव्याच्या सर्वेनुसार, पेरणी योग्य क्षेत्र २७५८ हेक्टर होते. सद्यःस्थितीत २४५३ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य क्षेत्र म्हणून घेण्यात आले आहे. तसेच, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन सक्तीचे केले नसून, काहीजण सांगत असलेले हेक्टरी दीड लाख रुपये कोणत्याही शेतकऱ्यांना भरावे लागणार नाहीत. कोणीही एक रुपयाही भरायचा नाही.शासनाचे धोरण आहे की, बंद पाइपलाइनद्वारेच पाणी द्यायचे, मात्र कुठल्याही प्रकारे ठिबकनेच पाणी घ्यावे, अशी सक्ती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वागदरवाडीला बंदिस्त पाइपलाइनमधून पाणी वागदरवाडी, आडाचीवाडी व परिसरात सद्यःस्थितीत सुरू असलेल्या बंदिस्त पाइपलाइनमधून पाणी देण्यात येणार आहे. तसेच, बंदिस्त पाइपलाइने त्या-त्या गावच्या ओढ्या-नाल्यावरील बंधारे भरून घेण्याची व्यवस्था केल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
वाल्ह्यात आल्यावरच पंपाचे नियोजन का ?
- वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या-वस्त्यांना मिळणारे पाणी विना बुस्टर पंपानेच मिळावे. त्या पाण्याला जर वाल्हेपर्यंत येईपर्यंत कुठलाही पंप नाही, मग वाल्ह्यात आल्यावरच पंप का ? बूस्टर पंप म्हणजे पुरंदर उपसा सिंचन योजनेसारखे नेत्यांच्या दारात जाऊन बसावं लागेल.
- 'आमच्या लाइट बिलाचा बघा लाइट बिल भरा', अशी वेळे येऊ शकते. त्यामुळे आम्हाला बुस्टर विहरीत पाणी द्यावे, अशी मागणीही शेतकरीवर्गाकडून करण्यात आली.
- दरम्यान, भाजपचे ओबीसी प्रदेश 3 उपाध्यक्ष सचिन लंबाते म्हणाले, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार वाल्हेकरांच्या मागणीप्रमाणे पश्चिम-उत्तर बाजूनेच पाइपलाइन जाऊन देण्याचे सांगितले असल्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित विभागाचे त्यानुसार काम करतील.
सन १९९३ खुल्या प्रवाही कालव्याच्या सर्वेनुसार जे क्षेत्र ओलीता खाली येणार होते, त्या सर्व क्षेत्राला आताही पाणी देण्यात येणार आहे, त्यामध्ये तीळमात्र क्षेत्र वगळण्यात आले नाही. आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र, आमचे ऐकून घेतले जात नाही. - नयन गिरमे, सहायक अभियंता