विमानतळाविरोधात गावकऱ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: May 9, 2017 03:36 IST2017-05-09T03:36:15+5:302017-05-09T03:36:15+5:30
विमानतळविरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्य सरकारच्याविरोधात प्रस्तावित विमानतळ प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी तहसील

विमानतळाविरोधात गावकऱ्यांचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : विमानतळविरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्य सरकारच्याविरोधात प्रस्तावित विमानतळ प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी तहसील कार्यालयावर विमानतळ विरोधी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.
पुरंदरमध्ये विमानतळास विरोध दर्शविण्यासाठी वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर - मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील शेतकऱ्यांनी नुकत्याच ग्रामसभा घेतल्या. यामध्ये शासनाचा जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव याना देण्यात आले. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी शेतकऱ्यांचा विरोध पत्करून विमानतळ करणार नाही, अशी ग्वाही दिली होती.
परंतु सध्या शासनाचे निर्णय पाहता विमानतळ होण्याच्या हालचाली दिसू लागल्याने गावकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विश्वास पाटील विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यामध्ये पॅकेज जाहीर होण्याबरोबरच सात उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकाऱ्यांची भूसंपादनासाठी नेमणूक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला होता. काहीही झाले तरी विमानतळच होऊन द्यायचा नाही, असा ठाम निर्धार या मोर्चातील महिलांनी व ग्रामस्थांनी केला होता. या वेळी अनेक प्रकल्पबाधितांनी राज्य शासनाच्याविरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. आजचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार सचिन गिरी शासनाच्या वतीने हजर होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली भोरचे उपविभागीय अधिकारी अशोक भरते, सासवडचे पी. आय. क्रांतिसिंह पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, लक्ष्मण बोरावके, संतोष हगवणे, अनिकेत कामठे, देविदास कामठे, कुंभारवळणचे सरपंच अमोल कामठे, जितेंद्र मेमाणे आदी शेतकरी उपस्थित होते.