‘आयपील’मुळे तरुणींचा बळी
By Admin | Updated: May 28, 2014 02:02 IST2014-05-28T02:02:59+5:302014-05-28T02:02:59+5:30
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी काँप्रेसेक्टिव्ह पील (आय पील) घेतली जाते. ही गोळी एकदाच घेणे आवश्यक आहे

‘आयपील’मुळे तरुणींचा बळी
पुणे : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी काँप्रेसेक्टिव्ह पील (आय पील) घेतली जाते. ही गोळी एकदाच घेणे आवश्यक आहे. मात्र मोठ्या प्रमाणात दाखविण्यात येणार्या आय पीलच्या रंजक जाहिरातींना भुलून महाविद्यालयीन तरुणी या गोळ्या मोठ्या प्रमाणात घेत आहेत, यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येऊ लागले आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘मासिक पाळी आणि स्वच्छता’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. सूथ हेल्थ केअरच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रवदा तेलंग, ‘युनिसेफ’चे अधिकारी युसूफ कबीर, इंग्लंडमधील माजी पोलीस अधिकारी मोना सेलडोन, प्राध्यापक अपर्णा दीक्षित, जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख डॉ. विनोद शाह, मीना शाह या तज्ज्ञांनी भाग घेतला. डॉ. तेलंग म्हणाल्या, ‘कोणतीही सुरक्षितता न बाळगता शरीरसंबंध आल्यानंतर गर्भधारणा नको असल्यास १२ तासांच्या आत आय पील गोळी घेणे आवश्यक असते. ही गोळी एकदाच घ्यायची असते. त्यानंतर ३ ते ४ दिवसांत पाळी येणे अपेक्षित असते. मात्र, पाळी आली नाही की पुन्हा गोळी घेतली जाते. जे पूर्णपणे चुकीचे आहे. मात्र, जाहिरातींमधील चुकीच्या माहितीमुळे या गोळ्या चॉकलेटसारख्या खाल्ल्या जात आहेत. माझ्याकडे दररोज महाविद्यालयीन ४ ते ५ तरुणी आय पील ३ ते ४ वेळा घेतल्यानंतरही पाळी न आल्याने येतात. या गोळ्या सारख्या घेतल्या तर पाळीचे चक्र बिघडून संबंधित महिलेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कबीर यांनी ‘महिला आणि मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता’ या विषयात देशातील व महाराष्टÑातील सद्य:स्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘महाराष्टÑ आणि देशात मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत महिलांमध्ये खूप वाईट स्थिती असून अनेक गैरसमजुती आहेत. देशात ११ ते १९ वयोगटांतील ११ कोटी ५० लाख मुली आहेत, त्यांपैकी ६ ते ८ कोटी मुली शाळांमध्ये जातात. त्यांना मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत. लातूर, चंद्रपूर आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये ९० टक्के मुलींना मासिक पाळी म्हणजे काय, हे माहितीच नसल्याचे ‘युनिसेफ’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. ६० ते ७० टक्के मुली या काळात शाळेतच जात नाहीत. ५० टक्के मुलींना पाळी हा एक आजार असल्याचे वाटते. आजही देशात ८८ टक्क्यांपर्यंत महिला सॅनिटरी नॅपकीनऐवजी कापडाचाच वापर करतात.’ सेलडोन यांनी ‘महिलांवरील अत्याचार आणि कायदे’ या विषयावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, ‘दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाने जग हादरले होते, यामुळे केंद्र शासनाने तातडीने पावले उचलत यासंबंधीचे कायदे कडक केले. मात्र आजही बलात्काराचे प्रमाण कमी झालेले नाही. महिलांवरील अत्याचाराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण भारतात खूप आहे मात्र शिक्षा मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.’ डॉ. विनोद शाह, मीना शाह, दीक्षित यांनीही मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)