कृत्रिम पावसाचा प्रयोग आजपासून
By Admin | Updated: September 16, 2015 02:48 IST2015-09-16T02:48:18+5:302015-09-16T02:48:18+5:30
पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा

कृत्रिम पावसाचा प्रयोग आजपासून
पुणे : पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुण्यात कृत्रिम पावसासाठी अनुकूल ढग उपलब्ध असल्याने या प्रयोगाचा प्रारंभ बुधवारपासून (दि. १६) पुण्यातील लोहगाव विमानतळावरून होणार आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत हा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात येईल. याबाबत विभागाचे प्रमुख सुहास दिवसे यांनी सांगितले, की मराठवाड्यात गेला महिनाभर हा प्रयोग सुरू होता. आता पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमान उड्डाणे करून हा कृत्रिम पाऊस पाडणार आहे. हे विमानतळ लष्कराचा हवाईतळ आहे. हवाईदल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या प्रयोगासाठी विमान उड्डाण व लँडिंगसाठी परवानगी दिली आहे. लोहगाव विमानतळावरून पश्चिम घाट क्षेत्रात पाऊस पाडण्याचे नियोजन आहे. धरणांतील कमी साठा व पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेता पाणलोट क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. भीमा उपखोऱ्यात २५ धरणे असून, आजपर्यंत या धरणांत ८५़६४ टक्के पाणीसाठा आहे़ हा क्षमतेपेक्षा केवळ ४०़०६ टक्के आहे़ गतवर्षी तो ९७़८६ टक्के इतका होता़ कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला, तर त्यातून धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे़
मराठवाड्यात आॅगस्टच्या पहिल्या व शेवटच्या आठवड्यात केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला चांगले यश मिळाले असून, अनेक ठिकाणी पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत़ पश्चिम महाराष्ट्रात येत्या १८ सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस वाढणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे़ त्यामुळे पुणे व परिसरात होणाऱ्या या प्रयोगाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)