पुणे : समाजात एकोपा व बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी पुण्यात गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक, विज्ञानदृष्ट्या समाजाला साक्षर करण्याकरिता या उत्सवाची भूमिका महत्त्वाची ठरू लागली. यातच गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशावेळी पुणे शहराला तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश काही गणेशोत्सव मंडळे देण्यात अद्यापही अग्रेसर आहेत. त्वष्टा कासार समाज संस्थेच्या श्रींची मूर्ती ही शमीच्या लाकडापासून बनवली गेलेली एक ऐतिहासिक मूर्ती म्हणून ओळखली जाते. यंदा हे मंडळ १२५ वे वर्ष साजरे करीत आहे. संस्थेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयीची माहिती देताना मंडळाचे अंजलेश वडके यांनी सांगितले, की साधारण १९०४ मध्ये शमीच्या वृक्षाच्या लाकडापासून मूर्ती तयार करण्यात आली. गुजरातमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली. वास्तविक गणपतीला प्रिय असणारा शमी वृक्ष हे एक धार्मिक कारण असून शमीच्या सालीचा उपयोग दमा, श्वेतकुष्ठ, कुष्ठरोग या रोगांवर होतो. उत्सवाबरोबरच त्यातून वैज्ञानिक व आरोग्यपूर्ण संदेश जात असल्याने लाकडाची गणेशमूर्ती कायम ठेवण्यात आली आहे. त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला तब्बल ११४ वर्षे पूर्ण झाली असून तिचे जतन करण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून ती मूर्ती फायबरची आहे. नागरिकांनी निसर्गाची हानी होऊ नये, याकरिता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी शोभायात्रा व श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून संदेश दिला जातो.
* ‘ना गुलाल ना डीजे’ पारंपरिक वाद्ये जाऊन त्याची जागा डीजेने घेतली. मात्र यामुळे वाद्यानंद हरपून त्याची जागा गोंगाटाने घेतली. गेल्या काही वर्षांपासून शहरात डीजेची क्रेझ वाढत असून ढोल, झांज, लेझीम यांचा आनंद घेण्यास कुणी मागत नाही. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना कमीत कमी प्लॅस्टिक, थर्माेकोलचा वापर, शताब्दी वर्षापासून नो गुलाल आणि नो डॉल्बी असा निर्णय त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.