गॅस शवदाहिनीच्या प्रस्तावावरून ‘यू टर्न’

By Admin | Updated: September 7, 2016 01:20 IST2016-09-07T01:20:59+5:302016-09-07T01:20:59+5:30

गेल्या महिनाभरापासून गॅस शवदाहिनी खरेदीचे प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.

'U Tern' from Gas Corps offer | गॅस शवदाहिनीच्या प्रस्तावावरून ‘यू टर्न’

गॅस शवदाहिनीच्या प्रस्तावावरून ‘यू टर्न’

पिंपरी : गेल्या महिनाभरापासून गॅस शवदाहिनी खरेदीचे प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे चौकशी अहवाल येईपर्यंत गॅस शवदाहिनीचा विषय मागे घेतल्याचे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीत जाहीर केले. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल कधी सादर होणार याबाबत महापालिका वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेत झालेल्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती डब्बू आसवानी होते. महापालिका पर्यावरण विभागाच्या वतीने पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपरी वाघेरे, वाकड आणि दापोडी या पाच ठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये गॅस शवदाहिन्या बसविण्याचा विषय ९ आॅगस्टच्या स्थायी समिती सभेच्या विषयपत्रिकेवर होता. त्या वेळी नगरसेविका सीमा सावळे यांनी याबाबत जोरदार आक्षेप घेतला होता. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून स्थायी समितीने पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी हे गैरहजर असल्याचे कारण पुढे करून प्रस्ताव तहकूब ठेवला होता. तिरडी आंदोलनांतर आयुक्त वाघमारे यांनी १३ आॅगस्टपासून संजय कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्रिसदस्यीय चौकशी समितीद्वारे चौकशी सुरू केल्याचेही जाहीर केले होते. याप्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादीची कोंडी झाल्याने अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करावी, असा सूर सत्ताधाऱ्यांनीआळविला होता. चौकशी समितीचा अहवाल सादर होईपर्यंत वादग्रस्त प्रस्ताव स्थायीच्या विषयपत्रिकेवरून मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केली होती.
दरम्यान, याबाबतचा अहवाल सर्वसाधारण सभेत सादर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना सदस्यांनीही केली होती. आजच्या विषयपत्रिकेवरही हा विषय होता. त्या वेळी शवदाहिनीचे हे प्रस्ताव विषय पत्रिकेवरून मागे घेत असल्याचे आयुक्त वाघमारे यांनी जाहीर केले.(प्रतिनिधी)

कामे होत नसल्याने शिवसेना सदस्यांचा सभात्याग
पिंपरी : महापालिका स्थायी समितीच्या सभेत आयुक्त दिनेश वाघमारे ग्रामीण भागातील सदस्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाहीत. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे विकासकामे रखडली आहेत, असा आरोप करून शिवसेना सदस्यांनी निषेध म्हणून सभात्याग केला. स्थायी समितीची सभा आज झाली. त्या वेळी शिवसेनेचे सदस्य धनंजय आल्हाट यांनी रखडलेल्या देहू-आळंदी बीआरटी रस्त्याबाबतचा प्रश्न मांडला.
‘‘आळंदी-देहूगाव या बीआरटी मार्गाच्या कामाची मुदत संपली आहे. मात्र, काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण नसतानाही बीआरटी मार्गाच्या ठेकेदाराला रक्कम अदा केली आहे, ही प्रशासनाची चूक आहे,’’ असा प्रश्न आल्हाट मांडत असताना आयुक्त इतर अधिकाऱ्यांशी बोलत होते. त्याचबरोबर सह शहर अभियंता राजन पाटील हे याबाबत खुलासा करीत असताना आयुक्त लक्ष देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे सदस्य आल्हाट आणि संपत पवार यांनी आयुक्त आणि प्रशासनाचा निषेध करून सभात्याग केला.
या विषयी आल्हाट म्हणाले, ‘‘तळवडे ते जाधववाडी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. खड्डे पडलेले आहेत. काम अपूर्ण असतानाही ठेकेदारांना बिले कशी अदा केली जातात. जाधववस्ती ते मोशी बायपास रस्त्याचे काम पूर्ण होऊन सहा महिनेही झाले नाहीत. नगरसेवक म्हणून आम्हाला नागरिक प्रश्न विचारतात आम्ही काय उत्तर द्यायचे. अकार्यक्षम प्रशासनामुळे विकासकामे रखडली आहेत. आयुक्तांचा प्रशासनावरही वचक राहिलेला नाही. विकासकामे थंडावली आहेत. त्यामुळे गांभीर्य नसणाऱ्या प्रशासनाचा शिवसेना सदस्यांनी निषेध केला.’’
आयुक्त म्हणाले, ‘‘शहरातील ग्रामीण भागास भेट द्यावी, अशी मागणी सदस्यांची मागणी होती. त्यानुसार चिखली आणि अन्य काही भागास भेटही दिली. आल्हाट यांनीही त्यांच्या भागास भेट द्यावी, अशी मागणी केली होती. ऐनवेळी काही बैठक लागल्याने नियोजित दौरा रद्द झाला होता. त्यामुळे आल्हाट यांचा गैरसमज झाला असावा. ग्रामीण भागास भेट देण्यास टाळाटाळ करण्याचा उद्देश नाही.’’

Web Title: 'U Tern' from Gas Corps offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.