शहरात वीजचोर वाढले दुपटीने
By Admin | Updated: December 23, 2015 00:02 IST2015-12-23T00:02:08+5:302015-12-23T00:02:08+5:30
वेगवेगळ्या पद्धतीने वीजचोरीचे प्रकार शहरातील अनेक भागांत सर्रासपणे सुरू आहेत. ही वीजचोरी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने कंबर कसल्याने वर्षभरात अशा वीजचोरट्यांवर कारवाईची धडक

शहरात वीजचोर वाढले दुपटीने
पिंपरी : वेगवेगळ्या पद्धतीने वीजचोरीचे प्रकार शहरातील अनेक भागांत सर्रासपणे सुरू आहेत. ही वीजचोरी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने कंबर कसल्याने वर्षभरात अशा वीजचोरट्यांवर कारवाईची धडक मोहीम राबवली जात आहे. वर्षभरात गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण तुलनेत दुप्पट झाले आहे.
वीजमीटर फेरफार, तांत्रिक जोडणी, थेट उघड्या तारा आणि डीपीमधून वीजजोड, रिमोट कंटोलद्वारे जोड, बोगस मीटर जोड आदी वेगवेगळ्या तऱ्हेने वीजचोरी केली जात आहे. झोपडपट्टी, चाळी, कॉलनीबरोबच हौसिंग सोसायट्या, उच्चभ्रू वसाहतीमध्येहीअसे प्रकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर व्यापारी आणि औद्योगिक ठिकाणीही वीजचोरीचे प्रकार समोर आले आहेत. वीजचोरी होत असल्याचे महावितरणला समजत असूनही, कारवाईचा बडगा उगारला जात नव्हता. अधिकारी आणि कर्मचारी संगनमत करून आर्थिक तडजोडीतून यास प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारत होते.
मात्र, महावितरणच्या नव्या धोरणानुसार वीजगळती आणि चोरी रोखण्यासंदर्भात सक्त आदेश दिले गेले होते. गळती (तांत्रिक वीज) आणि व्यापारी वीज चोरीच्या प्रकारास कोणत्याही स्थितीत आळा घालण्याचे आदेश दिले आहेत. तांत्रिक वीजगळती रोखण्यास मर्यादा असल्याने, वीजचोरीचे प्रकार रोखण्यावर अधिक भर दिला आहे.
त्यानुसार शहरातील पिंपरी व भोसरी वीज विभागाने विशेष तपासणी मोहीम राबविली आहे. अभियंत्यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र तपासणी पथकाची नियुक्ती करून घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांचे मीटर तपासले जात आहेत. तसेच, ग्राहकांच्या बिलाची तपासणी करून कमी रकमेच्या बिलावर लक्ष कें द्रित केले आहे. कमी रक्कम असलेल्या आणि शंकास्पद बिल असलेल्या ग्राहकांची यादी बनवून तेथे अचानक तपासणी केली जात आहे.
तपासणीत चोरीचे असंख्य प्रकार समोर आले आहेत. अशा ग्राहकांवर तडजोड आणि सरासरी अशी रक्कम भरण्यास सांगितले जाते. ती रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल केला जातो. अशा पद्धतीने घरगुती ग्राहकांसह औद्योगिक ग्राहकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षात हे
प्रमाण मागील तुलनेत सर्वाधिक
आहे. या पद्धतीने नियमित तपासणी कायम राहिल्यास वीजचोरीचे प्रमाण नगण्य होईल, असा महावितरणचा दावा आहे. (प्रतिनिधी)
वीजचोरी रोखण्याचे महावितरणचे आदेश आहेत. त्यानुसार सर्व भागांत तपासणी मोहीम राबविली जात आहे. दोषीवर कारवाई केली जात आहे. नादुरुस्त आणि संथ मीटर त्वरित बदलून दिले जात आहेत. अनेक घटनांमध्ये थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण दुप्पट झाले आहे. वीजचोरी होत असल्यास महावितरणला माहिती द्यावी.
- धनंजय औंढेकर,
कार्यकारी अभियंता (पिंपरी)
- धर्मराज पेठकर,
कार्यकारी अभियंता (भोसरी)
त्या कर्मचाऱ्यांची नावे कळत नाहीत
मीटरमध्ये फेरफार, थेट तारा आाणि डीपीतून जोड, तांत्रिक बदल अशा तऱ्हेने बेकायदा वीजजोड देण्याचे काम वीज कर्मचारीच करतात. थोड्या फार रकमेच्या आमिषाने ते असे जोड देतात. कारवाई झाल्यास संबंधित दोषी ग्राहक त्या कर्मचाऱ्याचे नाव सांगत नाहीत. त्यामुळे असा कर्मचाऱ्यांवर कारवाई करता येत नाही. अशा कर्मचाऱ्यांची नावे दिल्यास गुन्हे दाखल केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हौसिंग सोसायटीतच जादा चोर
वीजचोरी झोपडपट्टी आणि वस्त्यामध्ये होते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, कारवाईच्या नोंदीनुसार हौसिंग सोसायटी, उच्चभू्र इमारती आणि कारखान्यांत वीजचोरी झाल्याचे स्पष्ट होत आहे. सुमारे ९० टक्के वीजचोरीचे प्रकार अशा वर्गातून झाले आहेत. त्यामुळे या भागांकडे अधिक लक्ष देण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. तपासणी मोहीम मोठ्या संख्येने राबवीत आहेत.