नीरा खोऱ्यातील साखर कारखाने अडचणीत
By Admin | Updated: March 21, 2016 00:39 IST2016-03-21T00:39:38+5:302016-03-21T00:39:38+5:30
वाढत्या पाणीटंचाईने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच क्षेत्रांवर दुष्काळजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम झाला आहे.

नीरा खोऱ्यातील साखर कारखाने अडचणीत
बारामती : वाढत्या पाणीटंचाईने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच क्षेत्रांवर दुष्काळजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम झाला आहे. विशेषत: नीरा खोऱ्यातील साखर कारखानदारीला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे.
यंदाच्या गळीत हंगामावरदेखील त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. यंदाच्याच गळीत हंगामात जवळपास साडेचार लाख टनांहून अधिक ऊस नीरा खोऱ्यातील कारखान्यांचा जळालाआहे. तर, आगामी गळीत हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छत्रपती कारखान्याचा गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा या कारखान्याने ५ लाख टन २५ हजार उसाचे गाळप आजपर्यंत केले आहे. गतवर्षी ६ लाख ६५ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेने जवळपास सव्वा लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. आगामी गळीत हंगामासाठी १४ हजार एकर उसाची नोंद झाली आहे. ही लागवड पाणी परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगाम ‘रामभरोसे’ राहणार आहे. पावासावरच गळीत हंगाम अवलंबून आहे. सध्या तरी कारखान्याच्या गळीत हंगामाबाबबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत अर्धा टक्का साखर उतारा वाढला आहे.
नीरा-भीमा कारखान्याने यंदा ४ लाख ७४ हजार ४७५ टन ऊस गाळप केला आहे, तर गतवर्षीच्या तुलनेने सव्वा लाख टन ऊस गाळप केला आहे. आगामी गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रात ३ लाख टन ऊस गाळपास उपलब्ध आहे. येणाऱ्या पावसाळ्यावर या लागवडीचे अस्तित्व अवलंबून राहील. मार्च महिन्यातील उर्वरित दिवसांसह एप्रिल, मे या ऐन उन्हाळ्यात ही लागवड टिकवताना शेतकऱ्यांचा कस लागणार आहे.