टोलनाक्यावरील रांगांचा चालकांना त्रास
By Admin | Updated: May 26, 2014 05:24 IST2014-05-26T05:24:48+5:302014-05-26T05:24:48+5:30
मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वेळेचा व पैशाचा अपव्यय

टोलनाक्यावरील रांगांचा चालकांना त्रास
किवळे : मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असून, स्थानिकांसह वाहनचालक व प्रवासी त्रस्त आहेत. काही वाहनचालकांकडून अनेकदा लेनची शिस्तही पाळली जात नसून, ठेकेदाराकडून नाक्यावरील दोन्ही बाजूंची एक-एक लेन बंद ठेवली जात असल्याने गैरसोईत आणखी भर पडत आहे. त्यामुळे स्थानिकांना वेगळ्या लेनसह इतर लेनची व टोलवसुली खिडक्यांची संख्या वाढवून गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सोमाटणे फाटा येथे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणार्या म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत सप्टेंबर २००६ मध्ये नाका उभारून टोल वसुली सुरू आहे . आठ वर्षांत या महामार्गावरून ये -जा करणार्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे . मात्र लेनच्या संख्येत वाढ झालेली नाही . उलट नाक्यावरील दोन्ही बाजूकडील एक-एक लेन अनेकदा बंद ठेवली जात आहे. शनिवारी व रविवारी सर्वाधिक वर्दळ असते. त्या वेळी वाहनचालकांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही. (वार्ताहर)